*नॉयलान मांजा उत्पादनांवर बंदी आणि सर्वत्र पोलिस कारवाया का नाहीत?*
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
*संजय एम.देशमुख,(निंबेकर) ज्येष्ठ पत्रकार,अकोला*
*मोबा.९८८१३०४५४६*
============================
शासन,प्रशासनात बसलेली माणसे ही समाजातली स्वत:ला माणूस म्हणविणारी संवेदनशील माणसे आहेत का? हा या सगळ्यांना पोसणाऱ्या आणि याच मायबाप जनतेच्या जीवावर स्वत:ची ऐशोरामी आयुष्ये जगणाऱ्या शासन,प्रशासन,लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय व पोलिस अधिकाऱ्यांना समाजाचा यक्ष प्रश्न आहे. नॉयलॉन मांजा,गुटखा आणि असे अनेक निर्बंध हे कागदोपत्री जाहिर करून त्याआधारे अनेकांना भ्रष्टाचारांची कुरणे उपलब्ध करून देण्याची ही शासनाची मतलबी षड्यंत्रे आहेत का? याची उत्तरे समाजाला मिळाली पाहिजेत.कारण तो त्यांचा लोकशाहीतील संविधानिक हक्क आहे.याची उपरती शासन आणि प्रशासनाला झाली पाहिजे…!
नायलॉन मांज्याच्या विरोधात महाराष्ट्रातील पहिली कारवाई नाशिकमध्ये झाली.११ मुलांच्या पालकांना अटक करण्यात आली.७४ विक्रेत्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.मग आमचं अकोला आणि ईतर ठीकाणचं पोलिस प्रशासन अशा परिस्थितीतही गाढ झोपेत होतं काय? की हेतुपुरस्सर डोळेझाक सुरू होती. कारण नाशिकशिवाय ईतरत्र मांजा विकणारे आणि वापरणारे सक्रिय नव्हते. की ईतर ठीकाणी समजदार आणि जबाबदार लोक पोलिस प्रशासनाला दिसत होते.असे बेजबादारीचे चष्मे ज्या ठीकाणच्या पोलिसांना लागले होते तेथील नागरीकांचे गळे चिरून मृत्यूमुखी पडण्याच्या दुर्दैवी घटना घडलेल्या आहेत.तरीही प्रशासनातल्या माणसांना समाजातल्या अकाली जाणाऱ्या माणसांबध्दल काहीच वैषम्य वाटू नये हा अमानुष निगरगठ्ठपणा आहे.अशा कर्तव्यशुण्य आणि बेजबाबदार विचारशुण्य वर्तवणुकीमुळे अख्खा मानवी समाजच असंख्य संकटांच्या धोकादायक वळणावर आज उभा आहे.नायलॉन मांजाप्रमाणेच तरूण पिढीला संपवणारा गुटखा बाजार उघडपणे दिवसाढवळ्या सुरू आहे.अन्न व औषध प्रशासनाच्या मधुर संबंधातील कृपाशिर्वादाने आणि शासनाच्या हेतुपुरस्सर दुर्लक्षितपणाने अवैध गुटख्यांनी अनेकांचे जीव तर जात आहेतच.आता प्रशासनाच्या असंवेदनशिलतेमुळे नायलॉन मांजाने अनेकांचे गळे आणि शरीरे चिरून अनेक निरपराध्यांना यमसदनी धाडण्याची अमानुष कृत्ये काही असंस्कृत अपप्रवृत्तींच्या क्रुरकर्मांनी घडविले जात आहेत.असे भरपूर प्रकार अकोला आणि ईतरत्र घडलेले आहेत.परंतू कारवाया मात्र तुरळक आणि काही ठीकाणीच झालेल्या आहेत.अवैध उद्योगांना अभय देऊन मलिदे लाटणाऱ्या प्रेताच्या टाळूवरील लोणी खाणाऱ्या अपप्रवृत्ती या प्रकारांना खतपाणी घालत आहेत.ही मानवतेशी होणारी प्रचंड प्रतारणा आहे.
नायलॉन मांजाची दुसरी कारवाई चंद्रपूर जिल्ह्यात झाली.येथे सुध्दा ३४ विक्रेत्यांना ३ दिवसांसाठी तडीपार करण्यात आले.संभाजीनगरातही १० जणांना अटक झाली. महाराष्ट्रात ईतर ठीकाणच्या पोलिस प्रशासनाने या संदर्भात काय काम केले याची माहिती शासनाच्या गृहखाते आणि वरीष्ठ अधिकाऱ्यांनी मागवावी. या संवेदनशील प्रश्नांकडे मुद्दाम दुर्लक्ष करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कार्यवाही करावी.अशा कारवाया जोपर्यंत सुरू होत नाहीत तोपर्यंत अनुचित कामं करणारे असेच लोकांचे जीव घेत राहणार. आपलं काहीच बिघडत नाही या आविर्भावात पोलिस प्रशासन सुध्दा हातावर हात देऊन नुसती बघ्यांची भुमिका घेत राहणार
शासनाचा आरोग्य विभाग नकली औषधं पुरविणारांना पुरवठ्याच्या संधी दिली जाते,तर अन्न व औषध प्रशासन हे पुरवठे होत असतांना प्रमाणिकीकरणाच्या बाबतित डोळे लाऊन घेते.अशा चौफेर यमदुतांच्या काही टोळ्या निर्माण झाल्याने त्यांनी समाजजीवनाला घट्ट फास आवळले आहेत.नागरीकांच्या आयुष्याची शाश्वती आता राहीली नाही. कुणाच्या तरी कुकर्मांनी मृत्यू कधी कोणावर झडप घालेल याची शाश्वती राहीलेली नाही. या नोकरशहांना पोसणाऱ्या समाजातील लोकांचे जीव आज फारच स्वस्त झालेले आहेत.अशा बेकायदेशीर क्रूर वाटचालीत ते सहज जात राहतात.माणसं जन्माला येतात आणि काही नैसर्गिक कारण नसतांना आपल्याच माणसांच्या आघातामुळे अकाली मरतात.परंतू त्याचे वैषम्य कोणालाच वाटत नाही.
या अनैतिक प्रवाहांना कडक कारवायांनी थोपवलं जावं अशा प्रामाणिक ईच्छा शासनातील माणसांमध्ये आणि प्रशासनातील सेवकांच्या हृदयात जोपर्यंत निर्माण होत नाहीत तोपर्यंत,” बा मानवा! कधी पण आणि कसेही पण एकदाचे मरणे तुझ्या नशीबी आहे. तू यांना सोडलं, क्षम्य केलं.परंतू होणारे मृत्यू उघड्या डोळ्यांनी पाहणारांना तुझ्या मृतात्म्यांनी तरी सोडू नये” अशा संतापजनक भावना हे प्रकार पाहून निर्माण होत आहेत.अशाच प्रतिक्रिया समाजातून व्यक्त होत आहेत.शासनाने याची दखल घेतली पाहिजे आणि कडक कारवाया करून कामं न करणारांना घरांचे रस्ते दाखवले पाहिजेत.ही सामाजिक हिताची कर्तव्यवादी ईच्छाशक्ती अगोदर शासनामध्ये निर्माण होणे आवश्यक आहे. आपण सत्तेत बसलो म्हणजे आपल्यावर समाजाचं देणं आहे,हा विचार रूजत राहिला पाहिजे.सर्वप्रकारच्या कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीतून सामाजिक विकास पाहतांनाच लोकांच्या जीवांना घातक ठरणारे प्रकार घडविणारांवर कडक कारवाया होऊन त्यांना योग्य वेळेत शिक्षा झाल्या पाहिजेत! कायदे आणि सुव्यवस्थेच्या अंमलबजाणीत चालढकल करणारांनाही दंडीत करण्याची कर्तव्ये अंगिकारावी. तरच कायद्यांच्या राज्यात अनुचित पावलं टाकणारांना जरब बसेल आणि दुष्कृत्यांचे प्रमाण कमी होईल!
************************************