• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

तीनशे वर्षांच्या इतिहासातील प्रेरणादायी राणी: अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य आणि समाजसेवा”

May 28, 2025

Loading

“तीनशे वर्षांच्या इतिहासातील प्रेरणादायी राणी: अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य आणि समाजसेवा”

सति धन्य-धन्य कलियुगी अहिल्याबाई/
गेली कीर्ती करूनिया भूमंडळाचे ठायी//
वर्णिती कीर्ती गातात संत जे गाणी/
झाली दैववशें ती होळकराची राणी//
शाहीर प्रभाकर यांच्या ओळींमधे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनाचा सार आहे.हे वर्ष पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे त्रिशताब्दी जन्मवर्ष साजरा होत असतांना संपूर्ण भारतवर्षाला त्यांच्या कार्यकर्तुत्वाने मोहिनी घातली आहे.असामान्य बुध्दीमत्ता,व्यवहारक्षमता,धर्मशीलता,धार्मिकता,उदारता,औदार्य, धर्मनिष्ठा,कृतिशीलता,न्याय्यबुध्दी हे सद्गुण त्यांच्याठायी ओतप्रोत भरलेले होते.त्यांच्या कार्याची दखल शासनाने घेतलेली आहे,ही गौरवाची व अभिमानाची बाब आहे.अहमदनगर जिल्ह्याचे नामकरण अहिल्यानगर असे केले.सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नांव दिले.नुकतीच चौंडी जि.अहिल्यानगर येथे राज्यमंत्रिमंडळाची विशेष बैठक पार पडली.या कॅबिनेट बैठकीत चौंडी येथील पु.अहिल्यादेवींच्या स्मृतिस्थळाचे जतन आणि संवर्धनासाठी निधी मंजूर करण्यात आला.उत्तर प्रदेशचे माननीय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी औरैया येथील मेडिकल कॉलेजला अहिल्याबाई होळकर हे नांव देण्याची घोषणा केली.
वरील सर्व बाबींचा विचार केला तर पु.अहिल्यादेवी होळकर यांचा इतिहास किती दैदीप्यमान आहे,हे लक्षात येते.आजही त्यांनी बांधलेल्या पायविहिरी,मंदिरे,घाट व छत्र्या त्यांच्या कार्यकर्तृत्वाची आठवण करून देतात.त्यांची लहानपणापासून भगवान शंकरावर श्रध्दा होती.मुघलांच्या आक्रमणामुळे नुकसान झालेल्या सोरटी-सोमनाथ मंदिराची त्यांनी पुनर्बांधणी केली.कुशावर्त घाट बांधला,जिथे सर्व जातींचे लोक पूजा करत असत.त्यांनी खासगीतून सुमारे सोळा कोटी खर्च करून चारधाम, सप्तपुरी आणि बारा ज्योतिर्लिंगांचा जिर्णोद्धार केला.त्यांच्या काळात हुंडा घेणाऱ्याकडून दुप्पट रक्कम वसूल केली जात असे.विधवा(एकल)महिलांना मूल दत्तक घेण्याचे स्वातंत्र्य होते.विधवांच्या पुनर्विवाहासाठी यशस्वी प्रयत्न केले.त्यांनी महिलांना युध्दकौशल्य शिकवले आणि महिलांची लष्करी तुकडी तयार केली.
पु.अहिल्यादेवींचा इ.स.१७६५ ते १७९५ असा तीस वर्षांचा शासनकाळ म्हणजे प्रजेसाठी सुकाळ होता.त्यांनी रस्ते बांधले.दुतर्फा झाडे लावली व त्यांचे संवर्धन केले.वीस कलमी कार्यक्रमाची मुहूर्तमेढ अहिल्यादेवींनी रोवली.त्यांनी दारूबंदी करून निकोप समाज व्हावा यासाठी प्रयत्न केले.अहिल्यादेवींची धार्मिक जीवनापेक्षाही राजकीय व सामाजिक जाणीव अधिक प्रगल्भ व विशाल होती.याची ग्वाही त्यांचे कार्य देते.व्यवहाराचे भान न सोडता,धार्मिकतेला उणेपणा न आणता दोहोंनाही उंचावले.जिथे जिथे या माऊलीचा हात लागला,तिथे व्यवहार व धर्म यांना वेगळे रूप आले.आज एकविसाव्या शतकात “जागतिक वन्य जीव निधी”सारख्या संस्था कार्यरत आहेत. पण त्या काळात या माऊलीने पाण्यात माशांना अन्न पुरवले.पशू-पक्षांसाठी कुरणे राखून ठेवली व ही संकल्पना २५० वर्षांपूर्वी प्रत्यक्षात आणली.
पु.अहिल्यादेवींबद्दल आचार्य विनोबा भावे म्हणतात की,”अडिचशे वर्षांपूर्वी अहिल्यादेवींनी सत्य, प्रेम, करूणा या विचारांची बीजं या मातीत पेरली आहेत. या भूमीतून एक ना एक दिवस त्यांचे वृक्ष उगवल्याशिवाय राहणार नाहीत.या विचारांचे अंकुरच मानवतेला सतत प्रेरणादायी ठरत राहतील. अहिल्यादेवींनी आपल्या हयातीत मानवतेचे इतके महान काम केले आहे की,त्यांचे अनुकरण केले नाही,तर अणुयुगातला सर्वनाश अटळ आहे.”आणि म्हणून हे ही खरे आहे की,भारताच्या पुण्यभूमीवर अनेक थोर व्यक्ती,महात्मे अवतरले पण या भूमीचे पुण्य जर कुणामुळे टिकून राहिले असेल, तर ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्यामुळेच.
अशा या थोर कर्मयोगिनी,राजमाता,लोकमाता,प्रजाहितदक्ष महाराणी,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त त्यांना मानाचा मुजरा…..

लेखक
सौ.वसुंधरा दशरथ लांडगे
संचालिका, अर्बन बँक, अमळनेर
विश्वस्त, खा.शि.मंडळ, अमळनेर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *