
भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्ताने अमळनेर पुस्तकांचे गाव ठरो
•पू.साने गुरुजीं आणि श्रीमंत प्रताप शेठजींच्या कर्मभूमीत अखिल भारतीय साहित्य संमेलन संपन्न होत आहे. ठिकाण आहे प्रताप महाविद्यालय अमळनेर.
•यानिमित्ताने शासनाकडून अमळनेर नगरी चकाचक करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झालेले आहे.
•अमळनेर ही खानदेश ची सांस्कृतिक राजधानी आहे.
•पूज्य साने गुरुजींनी विवेकनिष्ठपणे सुसंस्कारीत जीवन जगणे शिकवले.
•श्रीमंत प्रताप शेठजींनी सचोटीने उद्योग व व्यापार करणे शिकवले.
•साहित्य संमेलनाच्या निमित्ताने केवळ राज्यभारातूनच नव्हे तर देशभरातून व जगभरातून माय मराठीवर प्रेम करणारे वाचक रसिक, मराठीची साहित्याद्वारे सेवा करणारे कवी लेखक, मराठीचे विपुल साहित्य उपलब्ध करून देणारे प्रकाशक विक्रेते, संमेलनाबद्दल कुतूहल असलेले शहरी ग्रामीण, माता पिता, बाळ गोपाळ उपस्थित राहणार आहेत.
•साहित्य संमेलन स्थळास प्रत्येकाने भेट द्यावी. ही फार मोठी संधी खानदेश वाशीयांना प्राप्त झाली आहे.
•प्रत्येकाला शिस्तीचे पालन करावे लागणार आहे, परिसर स्वच्छ राहील याची काळजी घ्यावी लागणार आहे, वाहने पार्किंग स्थळीच लावावी लागणार आहेत.
•संमेलनास्थळी पुस्तकांचे स्टॉल मोठ्या प्रमाणावर असणार आहेत. चांगली पुस्तके सवलतीच्या दरात उपलब्ध होऊ शकणार आहेत. मुलांनी आपल्या खाऊच्या पैशातून आणि तरुणांनी आपल्या पॉकेटमनी मधून एक तरी पुस्तक विकत घ्यावे.
•ज्ञानाची, संस्कृतीची, परंपरेची अस्सल ओळख करून देणाऱ्या उत्तमोत्तम पुस्तकांचे स्टॉल्स बघण्याची, स्टॉल वरून पुस्तके विकत घेण्याची, विकत घेतलेल्या पुस्तकांनी आपापल्या घरातील बैठक सजवण्याची सर्वोत्तम संधी साहित्य संमेलनाद्वारे प्राप्त होणार आहे.
•आर्थिक दृष्ट्या सक्षम असलेल्या प्रत्येक अंमळनेरकर बंधू भगिनींनी या यानिमित्ताने आपल्या निवासस्थानी ग्रंथालयाची स्थापना करावी. आपल्या गरीब बंधू भगिनींना एक तरी पुस्तके सप्रेम भेट म्हणून द्यावे.
•”घराघरात पुस्तके” अशी अंमळनेरची ओळख करून देण्याची आणि वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्याची यानिमित्ताने मोठी संधी वाचक रसिक घेतील, साने गुरुजींसारखे ज्ञानसंपन्न होतील, गुरुजींची अंमळनेर अशी ओळख वृद्धिंगत करतील आणि “पुस्तकांचे गाव” अशी एक आदर्श ओळख राज्यापुढे निर्माण करतील याची खात्री आहे.
•अखिल भारतीय साहित्य संमेलन राष्ट्रीय पातळीवरील फार मोठा कार्यक्रम आहे. अमळनेरकरांवर याची जबाबदारी आहे. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रत्येक अमळनेरकर योगदान देईल. यासाठी हार्दिक शुभेच्छा!
प्रा डॉ एल ए पाटील,
माजी प्राचार्य, प्रताप महाविद्यालय अमळनेर