

जय श्रीरामच्या जयघोषात
देशभर दिवाळी साजरी
मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे)
अयोध्येतील प्रभू रामचंद्र यांच्या 500 वर्षांचा वनवास आज संपला. दुपारी 12.29 मिनिटांनी रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. ‘याची देही याची डोळा, ऐसा देखिला सोहळा’ अशी भावना देशातील कोट्यवधी रामभक्तांनी व्यक्त केली.
अंधेरी येथील हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल या शाळेतील संकुलातील रहिवाशांनी सुध्दा श्री प्रभू श्रीरामचंद्राच्या पालखीची भव्य शोभा यात्रा काढून आनंदाने व मोठय़ा उत्साहाने श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचा आनंद लुटला. श्री राम लल्लाच्या रुपात बालके व टाळ मृदंगाच्या गजरात निघालेल्या या अभूतपूर्व पालखीचे स्वागत स्थानिक नागरिकांनी केले. भजन, कीर्तन व प्रसाद यांनी सारे वातावरण मंगलमय झाले होते श्री राम प्राण प्रतिष्ठा सोहळा आम्ही यापुढे दरवर्षी साजरा करु अशी माहिती प्रकाश पंचाल यांनी दिली. राम भक्त धर्मेंद्र द्विवेदी यांनी सहकुटुंब पालखीचे दर्शन घेऊन अयोध्या नगरीत गेल्याचा आनंद झाला अशी प्रतिक्रिया दिली.
पंतप्रधानांच्या हस्ते विधिवत पूजा अर्चना झाली व साऱ्या विश्वाचे डोळे लागलेला हा श्री प्रभू श्रीरामचंद्राच्या प्राण प्रतिष्ठेचा नैत्रदिपक सोहळा रामभक्तांनी अनुभवला. संध्याकाळी घरोघरी दीपोत्सव साजरा करण्यात आला. श्री प्रभू श्रीरामचंद्राच्या शोभायात्रेने व श्री प्रभू श्रीरामचंद्राच्या जयघोषात साऱ्या देशात आगळीवेगळी दिवाळी साजरी करण्यात आली.