
देव दगडात नाही माणसात आहे हे सांगणारा -संत गाडगेबाबा !!
महाराष्ट्र भूमी महापुरुषांच्या विचाराने पुलकित झालेली भूमी आहे. एका एका महापुरूषाने स्वतःचे जीवन देशासाठी समर्पित केलेले दिसून येते. अशा हया भूमीत ज्या वेळी कर्मकांड, अज्ञान, पाप, पुण्य, स्वर्ग, मूर्तिपूजा याचे महाराष्ट्रात स्तोम माजले त्या काळात संत गाडगेबाबा ह्या अवलियाचा जन्म झाला. गाडगेबाबाचा जन्म शेणगाव येथे 23 फेब्रुवारी1876 ला झाला. अमरावती जिल्ह्यातील हे गाव..गाडगेबाबांचे नाव ढेबूजी झिंगराजी जाणोरकर होते. आईचे नाव सखूबाई होते.आई सुस्वभावी होती. मेहनत करून पोट भरावे ह्या विचाराची होती. शांत व निर्लेप स्वभावाची होती. गाडगेबाबाच्या कुटुंबाची परिस्थिती हलाखीची होती. आई फार संस्कारी होती. वडिलांना दारूचे व्यसन लागल्याने ते लवकर हे जग सोडून गेले. आई सर्व भावंडांना मामाच्या गावाला घेऊन आली. परिस्थिती बेताची असल्याने भूक भागविणे महत्वाचे होते. त्यामुळे मिळेल ते काम करत गाडगेबाबा उदरनिर्वाह करू लागले. मामाची शेती करणे, गुरेढोरे चारणे अशी कामे करु लागले. मामाला सावकाराचा त्रास होता तो आपल्या हुशारीने मिटविला. काही वर्षांनी तिथून काढता पाय घेतला. शिक्षण नसल्याने मोठी नोकरी भेटणे शक्य नव्हते. कामासाठी फिरतांना समाजाची धारणा काय आहे लक्षात आली. समाजात शिक्षण नसल्याने लोक कसा विचार करतात याचा अनुभव आला. देव माणसात पाहणे सोडून दगडात शोधणारी जनता पाहुन मन द्रवित झाले. गरीब, वंचित, नादार, कामगार यांचे हाल होत होते. समाजात चाललेल्या अन्यायकारक सावकारीला आपल्या निर्भीड व्यक्तिमत्त्वाने लगाम लावला. "बुडते हे जन, देखणे ना डोळा "ह्या उक्तीप्रमाणे समाजात अंधश्रद्धा पसरली होती. तीर्थस्थानावर जाऊन पाप मुक्त होतात हा कर्मठ विचार समाजात पिंगा घालत होता. गाडगेबाबांना हे पाहवले नाही. निसर्गाने दिलेले नदीच्या पाण्याचे स्वरुप सगळीकडे सारखे मग गावातील पाणी व तीर्थस्थानाचे पाणी पवित्र कसे?असा सवाल ते गावोगावी कीर्तनाच्या साह्याने करू लागले. देव दगडात नाही माणसात आहे हे ते जीव ओतुन सांगत..देव कुणी बनवला तर माणसाने..ग्रंथ, पुराण कुणी लिहिले तर माणसाने...मग माणूस सर्व करतो तर देव दगडात कसा?आई बापाची सेवा करा ते तुमचे दैवत आहे. गाडगेबाबा सारा महाराष्ट्र फिरले. तीर्थस्थानावर गेले परंतु ते मंदिरात गेले नाही. वैज्ञानिक दृष्टीकोण त्यांनी अंगी बाणला होता. ते म्हणायचे कारे बाप्पांनो! कुणी देव बघितला का देव!! लोक सांगायचे नाही! देवाले कपडे कोण घालते ते बाप्पा! लोक सांगत आम्ही..मग तुमच्या देवाले कपडे घालता येत नाही. तो तुम्हाले मदत कशी करिन, संकट आल्यावर धावून कसा येइल?बाप्पांनो देव माणसात बघा, गरिबात, भुकेल्या, रंजल्या, गांजल्यात बघा, त्यांची सेवा करा..गाडगेबाबांनी कीर्तनाद्वारे लोकांची मने साफ केली .सॉक्रेटिस प्रमाणे लोकांच्या मनातील भ्रम, अज्ञान दूर केले. ते गावोगावी जात गाव स्वच्छ करित, मंदिराचा परिसर, पाणवठे, नदिकाठावरील घाण साफ करित मग रात्री लोकांच्या मनातील कचरा साफ करित..साऱ्या देशाला स्वच्छतेचा वसा त्यांनी घालून दिला. त्यांच्या ह्या कृतीने महात्मा गांधी प्रभावित झाले होते. महाराष्ट्र शासनाने त्यांचे गाडगेबाबा अभियानावर असलेले नाव सुध्दा काढून टाकले. आज जर गाडगेबाबा असते तर लोकांना भूलथापा देऊन लुबाडणारे भोंदू बाबा वाढले नसते. आमची वारकरी परंपरा ती कर्मकांडाला मह्त्व देत नाही. तीच आपली मूळ परंपरा आहे. संत तुकाराम महाराजांनी भोंदू विरुद्ध विद्रोह केला. आजची किर्तन परंपरा पोट भरण्याचा व्यवसाय बनला. संत तुकाराम, गाडगेबाबा तसेच संतांनी कधीही किर्तनाचे पैसे घेतले नाही कारण ते समाज प्रबोधनाचे साधन होते. पैसा कमविण्याचे माध्यम नाही. आज ही किर्तन परंपरा संताच्या विचारावर टिकली असती तर महाराष्ट्रात इतर राज्यातील भोंदू बाबा येऊन चमत्कार सांगुन कोटयाधिश झाले नसते. आमच्या संताची परंपरा कामात देव शोधणारी आहे. कांदा मुळा भाजी विठाई माझी हे सांगणारे संत आमचे होते. त्यांनी कधी कर्मकांड सांगितले नाही. सनातन्यांना त्यांनी वेळोवेळी विरोध केला. गाडगेबाबा म्हणत देव मंदिरात नसतो मंदिरात पुरोहिताचे पोट असते .एक वेळ जेवण करु नका पण मुलांना शिकवा..दिनदुबळयांची सेवा करा..भुकेल्यांना अन्न दया, तहानलेल्यांना पाणी दया.हीच तुमची ईश्वर सेवा आहे. गाडगेबाबांनी प्रबोधनासाठी जीवन दिले. कधी कीर्तनासाठी ,प्रवचनासाठी साजूक तुपाचे जेवण घेतले नाही. गाव स्वच्छ करून माय माऊलीला साधे अन्न मागुन ते ही तिला लाकडाची मोळी देऊनच बर का!किती त्याग म्हणावा हा..आज उदंड झाली किर्तन, प्रवचने पण गाडगेबाबाच्या वैज्ञानिक विचाराचा त्यात सुगंध नाही भोंदूगीरीचा बोलबाला आहे. गावात महाप्रसाद होतो पण झोपडीतले बालक उपाशी झोपते. खरच अन्नाच्या पंक्ती उठविण्यापेक्षा वैज्ञानिक विचाराची ज्योत लावा. न शिकलेला माणूस गाडगेबाबा विदयापीठाचे काम करुन गेला. गाडगेबाबांचे किर्तन चालु असतांना त्यांच्या गोविंदा नावाचा मुलगा वारल्याची बातमी गाडगेबाबांना एक व्यक्ती कानाजवळ जाऊन सांगतो. गाडगेबाबा किर्तन न थांबविता आपले काम चालू ठेवले. किर्तन करतांना म्हणाले "गेले कोटयानुकोटी का रडू एकासाठी "इतके योगदान ह्या महापुरुषाचे आपल्यावर आहे. खरी स्थितप्रज्ञ अवस्था ते जगले. पोकळ विचाराने जगणारे ते संत नव्हते. ते म्हणत मी कुणाचा गुरु नाही व माझा कुणी शिष्य नाही. गुरु परंपरा सांगुन एकही सदगुण न अंगी आणणाऱ्या भोंदूंना ही मोठी चपराक होती. आज भोंदुगीरीचे पिक जोमात आलेले आहे. शिक्षित लोक ग्रहशांती, नारायण नागबली, पितृदोष, पाप, पुण्य वाढविण्यासाठी पुरोहीत सांगेल ती पूजा करतात. मंगळ दोष काढण्यासाठी अनेक प्रकारची पूजा केली जाते. गाडगेबाबा हे उज्ज्वल भारत हा कर्मकांड विरहित असावा यासाठी बुस्टर डोस देऊन गेले आहे. असा हा महापुरुष 20 डिसेंबर 1956 ला महाराष्ट्र पोरका करुन गेले.
पत्रकार
एस. एच. भवरे
9284695140