वेध शिक्षक निवडणूकीचा !
(राजकीय विश्लेषक उदय नरे यांनी मुंबई शिक्षक मतदार संघाचा घेतलेला वेध)

महाराष्ट्रा मध्ये राजकीय निवडणुकांमध्ये रंगत आलेली आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुका या लवकरच जाहीर होतील परंतु मुंबई शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीला रंग चढलेला आहे. जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात सर्वसाधारणपणे मुंबई शहरात शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होण्याची शक्यता आहे. मुंबई शिक्षक मतदारसंघाचे वर्तमान आमदार श्री कपिल पाटील यांची विधान परिषदेची मुदत संपली आहे व ते आता निवृत्त होतील. आमदार कपिल पाटील मुंबई शिक्षक मतदार संघातून पुनश्च निवडणूक लढविणार नाही व तशी घोषणाही आमदार कपिल पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमोर केली. मुंबई शिक्षक मतदार संघातून आमदार कपिल पाटील यांनी शिक्षक भारतीचे सुभाष मोरे यांची निवडणूक उमेदवारी जाहीर केली आहे. आणि दुसऱ्या ठिकाणी शिक्षक सेनेने माजी उपसंचालक ज. मो. अभ्यंकर यांनी आपल्या निवडणूक प्रचाराला सुरुवात केलेली आहे.शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी जमलेल्या सभागृहात निवडणूक प्रचाराचा जोर धरू लागला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात ज. मो अभ्यंकर यांनी यापूर्वी महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष पद भूषवले आहे. तसेच शिवसेना प्रणित महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे ते प्रांताध्यक्षही आहेत. शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी काम करणाऱ्या संघटनेचे ते अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे असलेल्या कामाचा दांडगा अनुभव पाहता या पदाला न्याय देतील असा विश्वास पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केला आहे. उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी अभ्यंकर सरांना कामाला लागा! असा संदेशवजा आदेश ही दिला आहे असे सुत्रांनी सांगितले.
महाविकास आघाडीची घडी अद्याप बसली नसल्याने दोन्ही संभाव्य उमेदवार आप – आपल्या मतदारसंघात क्रियाशील झालेले आहेत.आमदार कपिल पाटील यांचा राजकीय दरारा पाहता मुंबई शिक्षक मतदार संघ कोणाकडे राहतो? हे लवकरच स्पष्ट होईल.
तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे शिवनाथ दराडे यांनी महाराष्ट्र राज्य शिक्षक परीषद मुंबई तर्फे “यदा कदाचित रीटर्न्स “या नाटकाचा शो ८ मार्च रोजी महिला दिनाच्या निमित्ताने मुंबईतील एका नाट्यगृहात लावला आहे.शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी सुध्दा आपल्या शिक्षक मतदारांना एकत्र करण्यासाठी नाट्यगृहात नाटकाचे कार्यक्रम केले होते हाच हातखंडा शिवनाथ दराडे वापरत आहेत.तर दुसरीकडे अनिल बोरनारे हे मुंबईतील अनेक शाळांमध्ये जाऊन शिक्षकांच्या निवडणूक प्रचारासाठी सज्ज झाले. अनिल बोरनारे हे नेहमीच शिक्षकांच्या प्रश्नांवर प्रसार माध्यमांवर सक्रिय असतात. गेली अनेक वर्षे भारतीय जनता पक्षाच्या कार्यक्रमात ते सहभागी आहेत.प्रदेश कार्यकारणी भाजपा महाराष्ट्र राज्य याचे निमंत्रित सदस्यही आहेत. मुंबई भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष माजी शिक्षण मंत्री आशिष शेलार यांच्यासमवेत दोघांचाही संपर्क चांगला आहे. तसे पाहता आमदार आशीष शेलार आपल्या सर्वच कार्यकर्त्यांशी चांगला संपर्क साधून असतात यामुळे आशिष शेलार आपलेच आहेत असेच प्रत्येक कार्यकर्तांना वाटते. परंतु भारतीय जनता पक्षात कधी गुगली पडेल हे काहीच सांगता येत नाही असेही बोलले जाते.भारतीय जनता पक्षाचा निर्णय देवेंद्रलाही कळणार नाही इतका गुप्तपणे वरच्या पातळीवर होत असतो असे असताना मुंबई शिक्षक मतदार संघाच्या निवडणूक चांगलीच रंगत आलेली आहे.पक्षाकडून कोणाला उमेदवारी मिळेल किंवा एखादा उमेदवार पुरस्कृत केला जाईल हे शेवटच्या क्षणापर्यंत सांगता येत नाही.
महाराष्ट्र राज्य खासगी शिक्षक संघटनेच्यावतीने ज्ञानदेव लक्ष्मण हांडे यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. शिवाजी शेंडगे, भाजपा शिक्षक आघाडीचे मुंबई अध्यक्ष राजु बंडगर, जालिंदर सरोदे, प्रकाश शेळके, उपनगरातील शाळेतील शिक्षक विजय अवसरमोल यांचा एका शिक्षक आमदाराशी घनिष्ठ असलेला संपर्क साधून अन्य पक्षातून तिकीट प्राप्त करण्यासाठी प्रयत्न केले आहेत असे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले तसेच अन्य शिक्षक मतदार संघाचे इच्छुक उमेदवार रिंगणात तळ्यात – मळ्यात करत आहेत.
काही कार्यकर्त्यांनी आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधून आपल्या उमेदवाराची घोषण करत आहेत. मुंबई महानगरपालिका आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी अनेक राजकीय पक्ष संघर्ष करत आहेत त्यासाठी मुंबई शिक्षक मतदार संघ ही त्यांची प्राथमिक निवडणूक होणार आहे असे बोलले जाते. आमदार कपिल पाटील यांनी तीन मार्च रोजी एक मोठा मेळावा आयोजित केले आहेत आणि या मेळाव्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे स्वतः उपस्थित राहणार आहेत.
कपिल पाटील हे उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या समवेत असल्याने या निवडणूक मोठी रंगत येणार आहे. कोण कोणाबरोबर जाणार? कोण कुठे राहणार? असा प्रश्न पडला आहे. आमदार कपिल पाटील यांनी नितेश कुमार यांच्या बरोबरीने महाराष्ट्रातील महाविकास आघाडीची मोट
चांगल्या प्रकारे बांधली होती. नितीशकुमार समवेत गोरेगाव येथील अभूतपूर्व मेळावा व मुंबईतील बैठकीत आमदार कपिल पाटील यांचे बँनर चांगलेच झळकले होते. परंतु अल्पकाळातच नितीशकुमार यांनी महाविकास आघाडी जाण्याऐवजी भाजपची वाट धरली. बिहारमध्ये राजकीय उलथापालथ झाली यामुळे आमदार कपिल पाटील कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु एका खासगी वृत्तवाहिन्यांशी बोलताना आमदार कपिल पाटील यांनी महाविकास आघाडी बरोबर जाण्याचे सुतोवाच केले आहे. महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी बैठकीसाठी आमंत्रण केले व आपल्यावर विश्वास टाकला याबद्दल आमदार कपिल पाटील यांनी कृतज्ञताही व्यक्त केली आहे. आपण स्वतः आपल्या कार्यकर्त्यांसह महाविकास आघाडी मध्येच राहणार आहोत अशी माहिती कपिल पाटील यांनी पत्रकारांना दिलेली आहे. गेली तीन टर्म म्हणजे 18 वर्ष आमदार कपिल पाटील यांनी विधान परिषदेत सदस्यत्व म्हणून चांगले कार्य केलेले आहे. अनेक राजकीय पक्षातील नेत्यांची त्यांचा चांगला संपर्क आहे. निवडणूक प्रचाराची धुरा हाताळण्याची चांगले कौशल्य त्यांच्याकडे आहे. असे असताना आमदार कपिल पाटील यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय त्यांच्या शिक्षकांना व कार्यकर्त्यांना पचनी पडलेला नाही. स्वतः पुर्वाश्रमीचे पत्रकार असलेल्या कपिल पाटील यांच्या निवडणूक न लढण्याचा निर्णयाचे पत्रकारांनाही काहीच माहिती नाही.शिक्षक मतदारसंघातील आमदार कोण असणार? हे येणाऱ्या निवडणुकीतच स्पष्ट होईलच!