
लोकसभेच्या निवडणुकीत मतदानाची घटणारी टक्केवारी चिंतेचा विषय-आदर्श शिक्षक डि.ए.धनगर …
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
मित्रांनो, आपली लोकशाही अत्यंत बलशाली लोकशाही आहे. ती टिकवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. अर्थात शिकल्या सवरलेल्या लोकांची तर ती अधिकच आहे. त्यामुळे आपण जबाबदारीने लोकशाही टिकवण्यासाठी, मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजे.
त्याला कारणही तसेच समर्पक आहे. सध्या भारतात लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत. परंतु या लोकसभेच्या निवडणुकीत मतदानाची घटणारी टक्केवारी चिंतेचा विषय ठरत आहे. कारण 50 ते 60 टक्के मतदार मतदान करून देशाचे/ आपले भविष्य ठरवू शकणार असतील तर हा चिंतेचा विषय आहे. त्यामुळे आपण प्रत्येकाने प्रयत्नपूर्वक मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी झटले पाहिजे. आगामी काळात आपल्याला भेडसवणाऱ्या समस्या सोडवायचा असतील, तर आपल्या विचाराचा लोकप्रतिनिधी (खासदार) निवडून गेला पाहिजे. आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीला जाब विचारण्याचा अधिकार आपल्या सर्वांना आहे. कारण कायदेमंडळात बसणारा आपला हा हक्काचा खासदार असणार आहे. त्यामुळे आपण सर्वांनी मतदान करून जबाबदार लोकप्रतिनिधी निवडून दिला पाहिजे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे.
आपल्या स्वतःच्या भवितव्यासाठी, तसेच आपल्या मुलाबाळांच्या भवितव्यासाठी, मतदान करणे नितांत गरजेचे आहे. अर्थात आपण मतदान कोणालाही करा परंतु मतदानाच्या दिवशी मतदानाला अवश्य जा! आवर्जून मतदान करा!! आपले कितीही महत्त्वाचे काम असेल तरी वेळात वेळ काढून मतदानाला जाण्यासाठी विसरू नका.!!!
हि आग्रहाची विनंती एका पत्रकाद्वारे आदर्श शिक्षक डी ए धनगर यांनी केली आहे.