नववाचक घडविण्यासाठी समाजाला कृती कार्यक्रम द्यावे लागतील : विनोद शेंडगे
” नववाचक घडविण्यासाठी समाजाला कृती कार्यक्रम द्यावे लागतील ; केवळ वाचनाचे महत्त्व न सांगता वाचन संस्कृती वाढविण्यासाठी वाचनाचे सामाजिकीकरण झालं पाहिजे . वाचनाचा उत्सव होऊन वाचन साजरं झाल पाहिजे.” असे प्रतिपादन विनोद शेंडगे ( परभणी ) यांनी केले.’ अक्षर आनंद सहकुटुंब पुस्तक वाचन स्पर्धा ‘ जनजागृती अभियानांतर्गत विनोद शेंडगे परभणी ते नंदुरबार सायकल यात्रा करीत आहेत.वल्लभदास वालजी वाचनालय जळगाव येथे शुक्रवार दिनांक ७ जून २०२४ रोजी आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना विनोद शेंडगे बोलत होते.
जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय,वल्लभदास वालजी वाचनालय व जिल्हा ग्रंथालय संघ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय विचारसभेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुहास रोकडे साहेबांनी केले.वाचन कमी झाले हा आक्षेप चुकीचा असून उलटपक्षी वाचन आता तुकडया तुकडयाने व्हॉटस् अप व फेसबुक या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मिनिटा – मिनिटांनी अखंड व गतीने होते आहे असे रोकडे यांनी सांगितले. ‘अक्षर आनंद वाचन चळवळीचे ‘ प्रवर्तक आनंद शेंडगे सर यांच्या कार्याचा परिचय वल्लभदास वालजी जिल्हा वाचनालयाचे ग्रंथपाल अनिल अत्रे यांनी करून दिला.
पुढील मार्गदर्शनात विनोद शेंडगे म्हणाले की , ‘ मुलांना बालपणीच वाचनाची गोडी लावून त्यांची वाचन बैठक तयार केली पाहिजे म्हणजे त्यांना अभ्यास करा सांगण्याची गरज पडणार नाही ते उत्स्फूर्तपणे स्वयंअध्ययन करतील.समाजात त्यांचे चुकीचे पाऊल पडणार नाही ; चुकीच्या दिशेने ते कधी जाणार नाहीत.समाजात सक्षम समाजाभिमुख नागरिक म्हणून जगतील. जीवनमूल्य समजून राष्ट्रीय कार्य देशसेवा म्हणून करतील.वाचनातून प्रश्न विचारणारा समाज निर्माण झाला पाहिजे आणि लोकनिती घडली पाहिजे.वाचन संस्कृतीच्या सार्वजनिकीकरणासाठी विनोद शेंडगे यांनी पुढील पाच कृती कार्यक्रम सांगितले – १) अवांतर पुस्तकाची रोज दहा पान नियमित वाचूया २ ) वाचण्यासाठी निमित्त शोधूया ३ ) पुस्तक वाचन स्पर्धा ४ ) वाचन संस्कार केंद्र ५ ) मी वाचलेल्या पुस्तकावर बोलूया / लिहूया.
विद्यार्थी अनुकरणप्रिय असतात म्हणून पालकांनी व शिक्षकांनी स्वतः वाचन आदर्श निर्माण करून दिला पाहिजे .पालकांनी आपल्या कुटुंबात सामूहिकपणे रोज वाचन करण्याचा संस्कार केला पाहिजे.वाचन संस्कार ही संस्कृती बनली पाहिजे.पुस्तक वाचन म्हणजे आपल्याला एका आयुष्यात अनेक आयुष्य जगता आले पाहिजे याची प्रचिती आली म्हणजेच आपण वाचन संस्कृतीचे सजग व्रतस्थ शिलेदार होऊ. परिणामी वाचनसंस्कृती सामाजिक पटलावर जाणीवपूर्वक आणली पाहिजे.त्यासाठी अक्षर आनंद चळवळ वाचणाऱ्यांचा गौरव आणि सन्मान समारंभ पूर्वक करून वातावरण निर्मिती करीत असते त्यासाठी राबविलेले सृजनशील उपक्रम शेंडगे सरांनी सांगितले.
भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशीचे संस्थापक जिल्हाप्रमुख विजय लुल्हे
मार्गदर्शनात म्हणाले की, ‘ वाचन संस्कृती ही आत्मोन्नती, समाजोन्नती व राष्ट्रोन्नतीची गुरूकिल्ली आहे.शाळा , ग्रंथालय व पालक यांच्या कडून नेहमी वाचन संस्कृती वाढविण्याची अपेक्षा न करता सामाजिक कार्यकर्त्यांनी वाचन चळवळीसाठी थोरांच्या जयंती व पुण्यतिथीचा निरर्थक उन्मादीपणा व अनाठायी खर्चावर पायबंद घालून उत्कृष्ट वैचारिक व प्रेरणादायी पुस्तके बालकांना,विद्यार्थ्यांना व युवकांना अभिरूची व वाचनस्तराच्या वयोगटानुसार उपलब्ध करून दिली पाहिजे.पुस्तकांवर आधारित लेखन स्पर्धा आयोजित करून वाचकांचा अन्य स्पर्धा विजेत्यांप्रमाणे पुरस्कार देऊन सन्मानित केले पाहिजे.आताची पिढी मोबाईलच्या आहारी जाऊन विचारशून्य व संवेदनशून्य झाली आहे. त्यांच्याइतकेच अक्षम्य दुर्लक्ष करणारे आपणही दोषी आहोतच ….याचे उत्तरदायित्व पालकांनी स्विकारलेच पाहिजे. अन्यथा कुटुंब व समाजात मुल्यांचा ऱ्हास होऊन अनिर्बंध अनाचार व भ्रष्टाचार माजेल.परिणामी पुढील पिढ्यांचे जीवनच निरस होणार नाही तर राष्ट्रही चैतन्यहीन होईल…..पुस्तक भिशी अंतर्गत राबवित असलेले मूल्याधिष्ठित समाजाभिमुख व जीवनाभिमुख विविध प्रेरणादायी उपक्रम विजय लुल्हे यांनी सांगितले. समारोपानंतर अनौपचारीक चर्चेतून विनोद शेंडगे सरांनी उपस्थित ग्रंथपाल व ग्रंथप्रेमी यांच्याशी सुसंवाद करून शंकानिरसन करीत अभियानाबाबत दिशा दिग्दर्शन केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी कुटुंब वाचन संस्कृतीचे प्रवर्तक विनोद शेंडगे यांचा जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुहास रोकडे ,जिल्हा वाचनालयातर्फे ग्रंथपाल अनिल अत्रे यांनीही ग्रंथ देऊन सत्कार केला.भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी तर्फे विजय लुल्हे यांनी शेंडगे यांचे स्वागत केले.
चिंतन सभेस ज्येष्ठ कार्यकर्ते प्रा.डॉ.युवराज वाणी,पुंडलिक राणे ( अध्यक्ष,श्री स्वामी रामानंद सार्वजनिक वाचनालय, जळगाव ), रविंद्र पाटील (अंजन विहिरे ), देविदास पाटील ( निंभोरा ), विजय पाटील ( सोनवद खु ॥ ),भैय्यासाहेब पवार ( शेवाळे बु ॥पारोळा ), सुदाम पाटील ( जळगाव ), संजय बेलदार ,साने गुरुजी न.पा.वाचनालयाचे ग्रंथपाल मणिराम डाबोरे ,रऊफ शेख तसेच व.वा.वाचनालयाचे ग्रंथालयीन कर्मचारी गुलाब मोरे , ज्ञानदेव वाणी,गिरीष तारे,सौ.शांता तांदळे,सौ.हर्षदा गिरासे,कु.मेघना सोनार उपस्थित होते.


