आनंददायी समाजजीवन हिच खरी प्रकाशमान दीपावली…!*
============================
*संजय एम.देशमुख,(निंबेकर)ज्येष्ठ पत्रकार*, *अकोला*
*मोबा.क्र. ९८७१३०४५४६*
=============================
दीपावली म्हणजे दिव्याचा सण, प्रखर प्रकाशाची रोषणाई, वैभवाच्या रुणझुणरूपी अस्तित्वाची जाणीव आणि या आनंदमय मंगल पर्वातून सुख, समृद्धीची चाहूल..! आपल्या पाऊलांनी वैभव घेऊन येणाऱ्या माता महालक्ष्मीचे आगमन…! तिच्याच सान्निध्यात आशा आकांक्षा जागविण्याचा काळ…! मानसिक आणि भौतिक विकासाच्या दिशेने जाण्यासाठी प्रबळ आत्मविश्वासाने करावयाची ही तयारी…! मात्र आजच्या बदललेल्या काळात *‘गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी‘* असे शब्द जनमाणसामध्ये ध्वनित होतांना आढळतात.परंतु नेहमी सकारात्मकच विचार करावा असे म्हटले तरी विदारक वास्तवता स्विकारण्याशिवाय पर्याय राहत नाही. कारण आभासी जगात माणूस जास्त काळ तग धरू शकत नाही. दिवाळी हा भारतियांसाठी सर्वात मोठा सण! महन्मंगल महालक्ष्मीच्या आराधनेसोबतच फटाक्यांची आतषबाजी, दिव्यांची प्रखर रोषणाई आणि खाण्यापिण्याच्या चंगळीसह आप्तस्वकियांच्या भेटीगाठींचा सुवर्णयोग…..अशा अविस्मरणीय आनंदाच्या क्षणांची एक संधी! ती वर्षात कोणत्या महिन्यात येणार म्हणून कॅलेंडरची पाने उलटवित त्या दिवाळीच्या येण्याची प्रतिक्षा लहानापासून तर मोठ्यांपर्यंत सर्वच करीत असतात. भारतीय माणूस हा तसा उत्सवप्रिय आहे. परंतू काळाची तुलना करता उत्पन्नाचे घटलेले स्त्रोत,शेतीची बदलेली परिस्थिती वाढती महागाई,बेरोजगारी,आणि माणसाला केन्द्रस्थानी न ठेवता आखली जाणारी उफराटी शासकीय धोरणे, यामुळे समाजातील आर्थिक अस्थिरता कमालीची वाढलेली आहे.त्यामुळे भारतिय माणूस हा उत्सवप्रिय जरूर आहे…उत्सवातून आनंद लुटण्यात तो अग्रेसरही आहे.परंतू त्या उत्सवांच्या जोडीला अनेक कारणांनी हातात हात घालून आलेल्या निरूत्साहांनी सणांच्या… उत्सवाच्या परंपरांना तोकड्या स्वरूपात आणून सोडलेलं आहे.
आपल्या संस्कृतीत उदयाला आलेले अनेक सण, महोत्सव हे परस्परांचे स्नेहमिलन, सुखांची घेवाणदेवाण आणि दुःखाला शितल करण्यासाठी परस्परांमध्ये समरसता साधण्याचे महोत्सव असतात.सामाजिक दायित्व अंगिकारण्याचे,सामाजिक दुरावे टाळून संघटीत राहण्याचे उद्देश सर्व सण आणि उत्सवामधून अभिप्रेत आहेत.आनंद, शांतता, स्थैर्य हे एका घरापुरते मर्यादीत न राहता ते ठिकठिकाणी निर्माण होऊन अख्ख्या समाजात सुख,समृध्दी आणि परमोच्च आनंदाचे नंदनवन व्हावे, अशा उदात्त भावना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तथा गाडगे महाराज आणि अनेक संतांनी हृदयात बाळगल्या होत्या. त्याकरीता सुखी जीवनाचा मुलमंत्र म्हणून त्यांनी मानवी जीवन मुल्ल्यांचा सतत उद्घोष केला.त्याद्वारे समाजात नीतिमान व्यक्तिमत्व निर्माण होऊन परस्परांचे जीवन सण,उत्सव गोड व्हावेत.उत्सव आणि त्यापलिकडे प्राप्त ईतर संधीतून आनंद क्षणांचे आस्वाद घेण्याईतपत मनुष्य जीवन सुलभ व्हावे अशी उदात्त स्वप्ने बाळगली.आपल्या मानसिक उर्जा आणि सद्भावनांच्या प्रेरक शक्ती या संकल्पनांसाठी खर्ची घातल्या.स्वतःसोबत इतरांच्या मानसिक आणि भौतिक विकासाच्या कार्यातही सक्रिय असावे यासाठी त्यांनी दिनचर्या, आचरण आणि सामाजिक व आर्थिक शिस्तीचेही धडे देऊन मनुष्याला योग्य मार्गाने चालण्याचे संदेश दिले.अशा जीवनशैलीने येणारी पहाट हिच खरी दिवाळी.. आणि तिचा अक्षय असा लाभ होण्यासाठीच *”संत येती घरा तोची दिवाळी दसरा”* असं म्हटलेलं आहे.
परंतू सामाजिक आणि राष्ट्रीय विकासासाठी *”माणूस द्या मज माणूस द्या”* म्हणणार्या सर्व संतांच्या मार्गदर्शनाचा, संस्कृतीचा आणि धर्मशास्त्रांच्या संकेतांचा मानवाला विसर पडला. त्यामुळे समाजात ग्रामपातळीपासून तर उच्च पातळीपर्यंत राजकीय, सामाजिक क्षेत्रात वाढलेल्या अनाचारी वाटचालीने आर्थिक विषमतेची दरी प्रचंड वाढली. माणूस माणसाचा तारणहार राहिला नाही. या बिघडलेल्या मनोवृत्तीने मानवताधर्माप्रती प्रचंड प्रतारणा होत राहिली.त्यामुळेच पहिला काळ राहिला नाही.सुगीचे दिवस ,त्या वैभवाच्या आठवणी फक्त कायम आहेत.असे हताश शब्द सण महोत्सवाच्या काळात आणि दैनंदिन जीवनात सर्वसामान्य मनुष्य आज व्यक्त करीत आहे. सुख, समृद्धी वैभवाची वरदायिनी महालक्ष्मीच्या आगमनाच्या या मंगलमय, पवित्र क्षणी ही निराशावादी भाषा योग्य नाही, असे कोणीही म्हणेल. परंतु समाजातील शेतकरी, श्रमिक आणि बेरोजगार युवावर्गाच्या झालेल्या आजच्या दैनावस्थेला बदललेल्या मनोवृत्ती जबाबदार आहेत. हे सत्य वेळोवेळी अधोरेखित झालं पाहिजे.ते नाकारून चालणार नाही. सामाजिक कर्तव्यातील बेजबाबदारपणामुळे अगोदरच कोरोनाच्या संकटाने क्षतिग्रस्त झालेल्या आणि त्यापूर्वी आणि नंतर वाढत्या महागाईने पिचलेल्या जनसामान्यांची दिवाळी आज पाहिजे त्या पध्दतीने साजरी होऊ शकत नाही. नैसर्गीक आपत्तीने गलितगात्र झालेले शेतकरी, शेतमजुर, श्रमिक आपल्या चिल्यापाल्यांना दिवाळीचा आनंद देऊ शकत नाहीत.त्यांच्या व्यथा काय आहेत ह्या कोणी समजावून घेतल्या काय? आपल्याच आनंदात मश्गूल असणारांनी अंधारात खितपत पडलेल्या वंचित,दुर्बलांच्या अंतर्मनाला समजून घेण्याचे प्रयत्न केलेत का?
आज शेतकरी, कष्टकर्यांची दिवाळी तर जाऊ द्या उदरनिर्वाहाचे सुध्दा प्रश्न गंभीर आहेत. वर्तमानात श्रीमंत, उद्योजक, वाम मार्गाने पैसा कमावणारे, आणि गलेलठ्ठ पगार घेणारे नोकरदार या वास्तव सत्याला जाणून घेण्याचा प्रयत्न करतांना दिसत नाहीत.यांच्याच दिवाळ्या फक्त अतोनात पैसा खर्च करून साजऱ्या होत असतात. परंतु स्वतःचे कुटूंब प्रकाशमान करताना उपाशी मरणारा आणि प्रसंगी बळी जाणारा शेतकरी, शेतमजुर रक्ताचे पाणी करून यांना बंगले बांधून देणार्या श्रमिकांच्या दिवाळीचा विचार यातील कितीजण करतात? याचा कधी एवढ्या वर्षात संवेदनशिलतेने विचार झाला काय? समाजाच्या संकटातही स्वतःचे स्वतःचे मतलब सिध्द करणारांना, घराघरात दारिद्रयाचा अंधार असताना स्वतः मौज, मस्तीच्या आणि वैभवाच्या लखलखाटात जीवन जगतांना काहीच वैषम्य वाटत नाही. या आर्थिक विषमतेबद्दल काहीच वाटू नये? स्व. रतन टाटांसारखे सामाजिक बांधिलकी जपणारे सेवाभावी भावनाशील उद्योगपती अपवादाने मिळावेत आणि बाकीच्यांनी खोऱ्याने पैसा ओढावेत. फक्त स्वत:च्याच ऐशोरामासाठी कोट्यावधीचा चुराडा करावा हे या संस्कृतीप्रधान देशातील फार मोठे दुर्दैव आहे. ही शोकांतिका,ही अमानविय वाटचाल हाच या प्रवृत्तींचा धर्म आहे का?
भोळ्या भाबड्या जनतेला फसविणार्या या लोकांनीच दिवाळी ऐवजी चक्क दिवाळे काढून त्यांना कंगाल करण्याचा विनाशकारी प्रवास सुरू केलेला आहे. खोटी समाजसेवा आणि फसवी भूतदया दाखविणाऱ्या बोलाचाच भात आणि बोलाच्याच कढीने लोकांची पोटे भरवण्याच्या घोषणा केल्या जातात. समाजाला जीवंतपणी दफण करण्याचे अमाननीय खेळ खेळले जात आहेत. जनतेच्या घरात अंधार असताना “दिपावलीच्या प्रकाशात समाजाचे जीवन उजळून जावो’ अशा शुभेच्छा देणे हे किती विसंगत आहे..! ही जनमाणसाची क्रुर थट्टा ठरत आहे. या ढोंगी वागणुकीत आनंद माणणार्यांना काय म्हणावे? ही गोष्ट आमच्या भारतियांनी लक्षात घेतली पाहिजे.
उन्मत आणि मस्तवाल ट्रम्प तात्याला पराभूत करून जमिनीवर पाय टेकविण्यास लावणार्या अमेरिका आणि पाश्चात राष्ट्रांकडूनही आता आम्ही शिकलो पाहिजे. भारतातल्या प्रत्येक माणसाच्या दर दिवसाला दिवाळीसारखा आनंद आणि उत्सवाचे सुख निर्माण झाले पाहिजे. परंतू समाजातील माणसांच्या शाश्वत विकासाकडे दुर्लक्ष हे अक्षम्यच आहे.फक्त आमचीच तेवढी अभिनव भारतीय संस्कृती….आमचीच उत्तम शासनव्यवस्था आणि आमच्याच देशाचे कर्तबगार पुरूष हिच तुणतुणी वाजविली जातात. वाजविण्याअगोदर जरा डोळे आणि कान उघडून मन आणि मेंदूची कवाडे उघडी केली पाहिजेत. नाहीतर स्वतःच्याच अहंकारामुळे जगातील समृद्ध लोकशाही आणि राजकीय सामाजिक नीतिमुल्यांच्या आदर्श परंपरेला आम्ही पारखे राहू. त्यामुळे इंग्रजांप्रमाणेच आम्हाला दिवाळीतही अंधारात ठेऊन, अज्ञानी ठेऊन आमच्यावर वैचारीक, आर्थिक आणि अनिष्ठ धोरणांची गुलामगीरी लादणारे आमचे समाजजीवन नष्ट केल्याशिवाय राहणार नाहीत. आज भ्रष्टाचार, चोर्या, नियम बाह्य कामे आणि बँका लुटून पळणारे उद्योजक, दरोडेखोर दिवसाच्या लख्ख प्रकाशातच देशातून पळून जात आहेत. दिवाळे काढून परदेशात सुखा समाधानाने आणि उजळ माथ्याने स्वतःच्या दिपावल्या साजर्या करीत आहेत. या वर्षात सर्वसामान्यांची दिवाळी ही उसणे अवसान आणि कुणी दिले तर आणखी कर्ज घेऊन साजरी केली जाणारी आनंदाची नव्हे तर जरा क्लेषदायीच दिवाळी ठरणार आहे. हे कशामुळे घडते आहे,हा विचार करून वैचारीक क्रांतीचे वारे वाहण्यास सुरूवात झाली पाहिजे. म्हणून माझ्या मायबाप शेतकर्यांनो, श्रमिकांनो माझ्या युवामित्रांनो, माझ्या मिडीयातील पत्रकारांनो स्वतःची स्वतंत्र विचारशक्ती जागृत करा! यापुढील आनंदनिर्मितीची वाटचाल निश्चित करणे हीच तुमची दिवाळी ठरणार आहे! या निर्माण झालेल्या आणि हाताबाहेर गेलेल्या विदारक परिस्थितीला सावरण्यासाठी पुढे येऊन आपले सामाजिक दायित्व ओळखून आणि जबाबदार नागरिकत्वाच्या कर्तव्यांची उजळणी केली पाहिजे. सामाजिक संवेदनेतून सर्व सामान्यांच्या प्रश्न सुटल्याशिवाय त्यांच्यासह शेतकरी कष्ठकर्यांची दिवाळी साजरी होऊ शकणार नाही! आपली नैतिकतेची खंबीर विचारसरणीची ताकद वाढविली पाहिजे. *‘मी भला आणि माझे घर भले’* या संकुचित विचारसरणीला फाटा देऊन स्वार्थ आणि मनातील गैरविचाराचे अंधार तथा अनैतिकतेची जळमटं या दिपावलीच्या शुभपर्वात बाजुला सारली पाहिजेत. उदात्त भावनेने अनिष्ठ प्रवृत्तींना वठणीवर आणून आपली आणि परस्परांची सोबत संपूर्ण समाजाची यापुढे विकासाच्या प्रकाशात दीपावली साजरी करण्याचा संकल्प केला पाहिजे….हिच खरी दीपावली! सर्वांच्या जीवनात दिवाळीच्या लख्ख प्रकाशातून विकासासाची किरणे चौफेर पसराव्यात ह्याच सदिच्छा..! आमच्या समस्त शेतकरी, शेतमजुर, श्रमिक आणि युवा पत्रकार मित्रांना आणि नागरिकांना दीपावलीच्या मनापासून आंतरीक शुभेच्छा!
=========================
👆🏻 *लेख प्रकाशनार्थ*