• Wed. Jun 18th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

शालेय नियोजनाप्रमाणे वार्षिक परीक्षा घेण्याबाबत शाळांचा अधिकार अबाधित ठेवावा आणि इयत्ता 5वी व 8 वीच्या दुबार परीक्षा न घेता PAT किंवा संकलित मूल्यमापन चाचणी 2 यापैकी कोणतीही एकच परीक्षा घ्यावी. महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना यांची शासन दरबारी मागणी

Mar 6, 2025

Loading

*शालेय नियोजनाप्रमाणे वार्षिक परीक्षा घेण्याबाबत शाळांचा अधिकार अबाधित ठेवावा आणि इयत्ता 5वी व 8 वीच्या दुबार परीक्षा न घेता PAT किंवा संकलित मूल्यमापन चाचणी 2 यापैकी कोणतीही एकच परीक्षा घ्यावी.
महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना यांची शासन दरबारी मागणी

गणेश हिरवे
मुंबई प्रतिनिधी

राज्यातील शाळांमध्ये दरवर्षी इयत्ता 1 ली ते 9वी विद्यार्थ्यांच्या परीक्षा साधारणपणे मार्च अखेरीस सुरू होऊन एप्रिल महिन्यांच्या पहिल्या आठवड्यापर्यंत शाळास्तरावरून घेण्यात येतात. आजपर्यंत परीक्षा व मूल्यमापन वर्षानुवर्षे सुरळीतपणे केले गेले आहे. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीसच अभ्यासक्रम व पाठ्यक्रम यांचा ताळमेळ घालून वार्षिक नियोजन शाळांकडून तयार केले जाते व त्यानुसार कार्यवाही होते. त्यामुळे वार्षिक परीक्षा घेणे, निकाल तयार करणे व घोषित करणे याचे स्वातंत्र्य शाळांना असावयास हवे. एप्रिल महिन्यात वार्षिक परीक्षा संपल्यानंतर निकाल तयार करणे, परीक्षेत नापास झालेली इयत्ता 5 वी आणि 8 वी विद्यार्थ्यांना पुनर्परीक्षेसाठी मार्गदर्शन, इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त मार्गदर्शन नियोजित असते. SCERT ने काढलेल्या परिपत्रकानुसार, 25 एप्रिल पर्यंत परीक्षा घेऊन 1 मे रोजी निकाल जाहीर करण्यास सांगण्यात आले आहे. अवघ्या 5 दिवसात निकाल लावण्याचा अजब निर्णय घेण्यात आला आहे. 26 एप्रिल ते 30 एप्रिल हा काळ परीक्षा घेतल्यानंतर आकारिक व संकलित मूल्यांकन करणे, प्रगतिपुस्तक बनविणे आणि 1 मे रोजी निकाल घोषित करणे, यासाठी अत्यल्प असल्याचे संघटनेचे दक्षिण विभाग संघटक श्री अमित कारंडे यांनी सांगितले.
तसेच इयत्ता 5 वी व 8 वीच्या तीन विषयांच्या दुबार परीक्षा, नियतकालिक मूल्यमापन चाचणी (PAT)आणि संकलित मूल्यमापन चाचणी ( वार्षिक परीक्षा ) घेण्याच्या सूचना संदर्भित परिपत्रकाद्वारे देण्यात आल्या आहेत. तीन विषयांच्या दुबार परिक्षा घेतल्याने विद्यार्थ्यांच्या मानसिकतेनर विपरित परीणाम होऊ शकतो. शासनाकडून PAT प्रश्नपत्रिका पुरवल्या जात असताना शाळांना पुन्हा वार्षिक परीक्षा घेण्याची सक्ती का केली जात आहे?PAT प्रश्नपत्रिका मार्फत विद्यार्थ्यांचे मूल्यमापन का होऊ शकणार नाही ?स्वतः‌च्याच प्रश्नपत्रिकांवर शासनाचा विश्वास नसेल तर PAT मूल्यांकन कशासाठी ? प्रश्नपत्रिका छपाई व अनुषंगिक खर्च वाढवून शासन वित्तहानी का करीत आहे? असा संतप्त सवाल संघटनेचे उपाध्यक्ष श्री अलीम सय्यद यांनी यावेळी विचारला.
प्रादेशिक हवामान केंद्र कुलाबा, मुंबई यांचेकडून मार्च-एप्रिलमध्ये तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. संपूर्ण राज्यात हीच परिस्थिती असणार आहे. एप्रिल महिन्यात उन्हाची तीव्रता आणखी वाढू शकते. त्यामुळे वार्षिक परीक्षा संपूर्ण एप्रिल महिन्यापर्यंत लांबणीवर टाकणे विद्यार्थ्यांसाठी धोकादायक ठरू शकते.
तेव्हा विद्यार्थी हित लक्षात घेता दि.05 मार्च 2025 चे अन्यायकारक परिपत्रक तत्काळ रद्द करून वार्षिक परीक्षा शालेय नियोजनाप्रमाणे 14 एप्रिलपूर्वी घेण्यात याव्यात. तसेच कोणत्याही इयत्तेच्या कोणत्याही विषयाची दोन वेळा परीक्षा घेण्यात येवू नये अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष श्री तानाजी कांबळे यांनी केली आहे. यास्तव मागणी निवेदन मा मुख्यमंत्री, मा शिक्षणमंत्री, मा शिक्षण आयुक्त, मा शिक्षण संचालक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आणि संचालक महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांना देण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed