परीक्षा शाळांची ? की परीक्षा शिक्षकांची?
पायाभूत परीक्षा की परीक्षेचे भूत!
(मुंबई विशेष प्रतिनिधी उदय नरे )
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागांने परीक्षा संदर्भात एक परिपत्रक काढले आणि शिक्षण क्षेत्रात कार्य करणाऱ्या शिक्षक,पालक आणि विद्यार्थी यांची एकच तारांबळ उडाली आहे . नवे शालेय शिक्षण धोरण महाराष्ट्रासह अनेक देशातील राज्यांमध्ये लागू होणार आहे. नव्या परिपत्रकानुसार शाळाच्या परीक्षा घेण्यासंदर्भात सूचना देण्यात आली आहे. आणि ये सूचनांनुसार इयत्ता पहिली ते नववी या विद्यार्थ्यांची परीक्षा आठ एप्रिल ते पंचवीस एप्रिल या काळात घ्यायची आहेत आणि एक मे ला महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर विद्यार्थ्यांचा निकाल त्यांच्या हाती द्यायचे आहे.
आज पर्यंत शाळातील परीक्षा घेण्याचे अधिकार हे शाळा प्रशासनाला होते व शाळेचे मुख्याध्यापक आपल्या शिक्षकांशी चर्चा करून शाळेचे वेळापत्रक ठरवत असत,आणि परीक्षेच्या निकाल एक मे च्या पूर्वीच लावत होते. परंतु या नवीन परिपत्रकांनुसार शाळातील परीक्षा घेण्यासंदर्भात निर्बंध आलेले आहे आणि परीक्षा शिक्षण विभागाच्या आदेशानुसार घेण्यात याव्यात अशा सूचना देण्यात आल्या आहेत. 25 एप्रिल पर्यंत परीक्षा घेऊन एक मे म्हणजे एका हप्त्यात सर्व विद्यार्थ्यांचे पेपर तपासून त्यांचे निकाल लावणे शक्यच नाही असा सूर राज्यातील शिक्षकांचा आहे. आणि तांत्रिक दृष्ट्या पहिले तर ते योग्यच आहे.शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या आणि पेपर्स तपासण्याचे काम एका हप्त्यात पूर्ण होणे शक्यच नाही त्यानंतर रिझल्ट म्हणजे परीक्षेचा निकाल बनवण्यासाठी काही काळ द्यावा लागतो आणि अशा परिस्थितीत जर शासनाने दिलेल्या परिपत्रकानुसार परीक्षा घेण्याचे ठरवले तर शिक्षकांवरती अन्याय होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांचे मूल्यमापन योग्य रीतीने होणार नाही असे लक्षात येते. त्यामुळे हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा असे शिक्षकांचे मत आहे.
राज्यातील शाळांमध्ये परीक्षा घेण्याबाबत समानता व सुसूत्रता आणण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने वेळापत्रक जाहीर केले आहे. शालेय शिक्षण विभागाचे कोणतेही निर्णय घेत असताना शिक्षकांना या प्रक्रियेत सामावून घेतले पाहिजे शाळा सुरू होण्याच्या सुरुवातीलाच म्हणजे मार्च एप्रिल महिन्यात निर्णय घेऊन ते पुढील शैक्षणिक वर्षात राबवण्यात यावे असा सूर शिक्षकांचा आहे.
इयत्ता तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी – १ व संकलित मूल्यमापन चाचणी-२ अशा तीन चाचण्यांचे आयोजन करता येणार आहे. सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये इयत्ता १ ली ते ९ वीच्या वार्षिक परीक्षांचा कालावधी समान ठेवण्यात येणार आहे. राज्यमंडळाच्याच राज्यातील शाळांमध्ये इयत्ता १ ली ते ९ वी वर्गाच्या परीक्षा सध्या मार्चच्या अखेरीस सुरू होऊन एप्रिल महिन्यांच्या पहिल्या हप्त्यात शाळास्तरावरुन घेण्यात येतात. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीस वार्षिक परीक्षा पूर्ण होतात.
राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळांचा निकाल महाराष्ट्र दिन ध्वजारोहणानंतर १ मे रोजी जाहीर करण्यात यावा. याचबरोबर २ मे पासून सर्व शाळांना उन्हाळी सुट्टी सुरु होणार आहे, असे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार यांनी स्पष्ट केले आहे.
शाळांना हे वेळापत्रक राबवणे आवश्यक आहे.
परीपत्रका प्रमाणे वेळापत्रकाचे परीक्षांचे आयोजन होईल यादृष्टीने आवश्यक कार्यवाही व नियोजन करावे. अपवादात्मक अथवा स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन नियोजनात बदल करावयाचे असल्यास शिक्षणाधिकाऱ्यांनी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या संचालकांची परवानगी घेऊनच बदल करावा, अशा सूचना शिक्षण आयुक्त कार्यालयामार्फत शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत.
शैक्षणिक वर्षाच्या अखेरीस परिपत्रक आल्यामुळे शाळा मुख्याध्यापकांचा संभ्रमा निर्माण झाली आहे शिक्षण विभागाच्या आदेशाचे पालन करावे याशिवाय दुसरा पर्याय त्यांच्यासमोर नाही. पालकांनी सुट्ट्यांचे नियोजन सुरुवातीलाच केल्यामुळे त्यांचे सर्व प्रवासाचे बेत रद्द करावे लागणार आहेत. शालेय शिक्षण विभागाने या परिपत्रकानुसार गोंधळाची अवस्था निर्माण झाली आहे त्यावर तोडगा काढावा या संदर्भात शालेय शिक्षण मंत्र्यांशी चर्चा केली पाहिजे असे मत अनेक शिक्षकांनी व्यक्त केले.