• Mon. Jun 16th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

मिल के चलो’तर्फे ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी विज्ञान शिबिर; कुतूहल वाढवणारा अनुभव*

Apr 28, 2025

Loading

*’मिल के चलो’तर्फे ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी विज्ञान शिबिर; कुतूहल वाढवणारा अनुभव*

अमळनेर : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयक कुतूहल निर्माण करण्यासाठी ‘मिल के चलो असोसिएशन’तर्फे दोन दिवसीय शैक्षणिक शिबिराचे आयोजन करण्यात आले. २६ व २७ एप्रिल रोजी चोपडा रोड येथील तात्यासो. डी.बी. जाधव शैक्षणिक संकुलात भरवलेल्या या शिबिरात ८ गावांतील जिल्हा परिषद शाळांमधून निवडक ५० विद्यार्थी आणि ‘विज्ञानघर’ उपक्रमातील वावडे येथील २० विद्यार्थी असे एकूण ७० विद्यार्थी सहभागी झाले होते.

दरवर्षी ‘मिल के चलो’तर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘विज्ञानवेध’ उपक्रमातून प्रत्येक शाळेतून सहा ते सात गुणवत्तापूर्ण व जिज्ञासू विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना शिबिरात सहभागी केले जाते. यंदाही पिंगळवाडे, जळोद, लोंढवे, गडखांब, देवगाव देवळी, सडावण, कावपिंप्री, नंदगाव आणि वावडे या गावांतील ग्रामीण मुलांनी विज्ञान क्षेत्रातील नवे अनुभव घेतले.

शिबिरात विद्यार्थ्यांना वैज्ञानिक खेळणी बनवणे, प्रयोग, गटकार्य, बौद्धिक सत्रे, विविध खेळ आणि वैज्ञानिक कोडी अशा उपक्रमांद्वारे विज्ञानाची गोडी लावली गेली. मोकळ्या वातावरणात शिकण्याचा आनंद घेत विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित केला. शिबिराच्या शेवटी अनेक विद्यार्थी भावनिक होत, “आम्हाला अजून दोन दिवस शिबिर हवे होते,” अशी प्रतिक्रिया देत होते. भविष्यात त्यांच्या शैक्षणिक वाटचालीत या शिबिरातून मिळालेला अनुभव निश्चितच उपयोगी ठरणार आहे.

शिबिरासाठी ॲड. शाम जाधव आणि सिद्धार्थ पाटील यांनी शैक्षणिक संकुलाची जागा आणि साहित्य मोफत उपलब्ध करून दिले. अनिरुद्ध पाटील, कल्याणी पाटील, प्रा. विनायक पाटील, चेतन वैराळे, वैष्णवी ठाकरे, अतुल सैंदाणे व विवेक सुर्यवंशी यांनी संपूर्ण शिबिराचे नियोजन आणि आयोजन यशस्वीपणे केले.

आर. जी. चौधरी (कावपिंप्री), मिलिंद पाटील (लोंढवे), सुनिल पाटील (जळोद), सुनिल मोरे (सडावण), विनय निकम (गडखांब), धिरज माळी (नंदगाव) यांच्यासह विलास मोरे, सुर्यवंशी आणि शिरसाठ यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. विशेषतः मिलिंद पाटील यांनी विद्यार्थ्यांसाठी गाणे गायले व त्यांना प्रोत्साहित केले तर आर. जी. चौधरी यांनी प्रेरणादायी गोष्टी सांगून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवला. विजय मोरे (साळवे हायस्कूल) सपत्निक उपस्थित राहून शिबिरात सहभागी झाले.

‘मिल के चलो’च्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयक कुतूहल वाढले असून भविष्यात ते विज्ञान क्षेत्रात मोठे यश मिळवू शकतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed