एप्रिल महिन्याचा पगार न मिळाल्यामुळे ट्रेझरी कार्यालयात शिक्षकांचे ठिय्या आंदोलन
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
जळगाव जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळांतील कर्मचारी वर्गाला एप्रिल महिन्याचा पगार अद्याप न मिळाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. कर्जासाठीचे हप्ते तसेच दैनंदिन गरजा भागविणे कर्मचारी वर्गासाठी अत्यंत कठीण झाले आहे. आज 21 एप्रिल असूनही पगार न मिळाल्याने शिक्षकांना आपल्या हक्कासाठी आंदोलन करावे लागत आहे, ही एक दुर्दैवी स्थिती असल्याचे मत व्यक्त केले जाते.
दोन दिवस अगोदर पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांनी जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांच्या समस्या मांडल्या होत्या. तरीही पगाराचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने शिक्षकांनी ट्रेझरी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, पगार खात्यामध्ये जमा होईपर्यंत किंवा समस्या सुटण्यापर्यंत ठिय्या आंदोलन न थांबविण्याचा इशारा देण्यात आला आहे.
या आंदोलनाद्वारे शैक्षणिक कर्मचाऱ्यांसाठी व आपल्या हक्कासाठी लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.