खोकरपाट येथील शंभू महिला शेतकरी गटाच्या १२ जलरागिनींनी शेतात जलतारा उपचारांसाठी पुढाकार
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
अमळनेर तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीत सुद्धा, खोकरपाट गावातील शंभू महिला शेतकरी गटातील १२ जलरागिनींनी फक्त घरकामातच नाही, तर गटशेतीत उत्कृष्ट काम करत जल व मृदा संधारणेसाठी महत्वाचा पुढाकार घेतला आहे. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत शासन स्तरावर त्यांचा जलतारा उपचार मंजूर होऊन, त्यांनी शेतात प्रत्यक्ष जलतारा कामे युध्दपातळीवर पार पाडली आहेत.
या उपचारांमुळे एका एकरात पाणी शेतातच रुजवले जाणार असून, विहीरीत पाण्याचा स्तर वाढेल आणि त्याचा फायदा पिकसंस्थानाला मोठ्या प्रमाणात मिळेल. महिलांच्या या उपक्रमामुळे आधी नकारात्मक असणारे पुरुषही त्यांच्या कार्याला पाठिंबा देत खांद्याला खांदा लावून काम करत आहेत.
अमळनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एन. आर. पाटील, मनरेगा योजनेचे टीपीओ किशोर पाटील, ग्रामरोजगार सेवक तसेच पाणी फाउंडेशन टीमच्या सहकार्याने या महिलांनी जल व मृदा संधारणेत एक मॉडेल शेत उभारण्याचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण केला आहे.
आणखी जलतारा उपचार करण्याची इच्छा असलेल्या गावांनी पाणी फाउंडेशन टीमशी संपर्क साधावा: ८२७५२७७११६ असे आवाहन केले आहे.
या जलरागिनींच्या उत्कृष्ट कामामुळे अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी नवचैतन्य निर्माण होणार आहे.