• Tue. Jul 8th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

समाजाच्या नजरेत अपूर्ण पण मनाने पूर्ण – प्रकाश सरांचा विजयाचा प्रवास जिद्द आणि प्रेमाने उजळलेलं आयुष्य – प्रकाश पाटील हे शिक्षक, कवी आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व

Jul 8, 2025

Loading

समाजाच्या नजरेत अपूर्ण पण मनाने पूर्ण – प्रकाश सरांचा विजयाचा प्रवास

जिद्द आणि प्रेमाने उजळलेलं आयुष्य – प्रकाश पाटील हे शिक्षक, कवी आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व

अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)

प्रकाश सर—ज्यांच्या नावातच उजेड दडला आहे, त्यांनी आयुष्यभर त्या उजेडाचा प्रसार केला आहे. दोन्ही पायांनी अपंग असले तरी त्यांच्या मनाने हिमालयाइतकं प्रचंड भक्कम ठसा उमटवला आहे. शरीराच्या अशक्ततेच्या बंधनांतही त्यांची जिद्द आणि मेहनत कधीच कमी झाली नाही. अत्यंत कठीण परिस्थितीतही प्रकाश सराने जीवनाचा संघर्ष केला.
कॉलेजमध्ये असतांना ‘कमवा आणि शिका’ या योजनेत सहभागी होऊन, त्यांनी स्वतःची आर्थिक जबाबदारी घेतली आणि इतर मुलांना शिकवणं सुरू ठेवलं. हॉस्टेलच्या कोपऱ्यात ठिकठिकाणी काम करीत त्यांनी शिक्षणासाठी कष्ट घेतले. पुस्तकांच्या पानांत हरवून, रात्र जागून त्यांनी M.A. English, बी.एड. तसेच SET परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर त्यांनी शिक्षणात आपलं स्वतंत्र साम्राज्य उभारलं आणि आज अनेक कुटुंबातील विद्यार्थी त्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी होत आहेत.
प्रकाश सर फक्त शिक्षक नाहीत; ते दुःखी हृदयांना आधार देणारे, गरजूंना हात देणारे, व्यसनापासून दूर राहणारे आणि बिलकुल संत स्वरूप असलेले व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांची मृदू, प्रेमळ बोली मनाला स्पर्श करते. त्यांची माणसं समजून घेत असलेली आणि शब्द नव्हे, तर अनुभव मांडणारी भाषा संवादाला जिवंतपणा देते.
आजही प्रकाश सर वैयक्तिक मत्सरांपासून अनभिज्ञ, कोणतीही मदत न घेत स्वतःच्या बलावर उभे आहेत. ते कधीही कारणचिन्ह म्हणून पाय न होणं सांगत नाहीत; उलट, मनाला धावा देत पुढं जाणं हेच त्यांचं ध्येय असून, त्यांच्या जीवनाने इतरांची वाट उजळते आहे.
पण त्यांच्या कार्याचं खरं तेज फक्त त्यांच्या यशात नाही, तर त्यांच्या ‘देणाऱ्या हातात’ आहे.
प्रकाश सर दरवर्षी ५वी ते १२वी या वर्गांत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला सायकल बक्षीस देतात — ही केवळ भेटवस्तू नसून, प्रयत्नांची, जिद्दीची आणि कष्टांची पोचपावती असते.
अंध व अपंग विद्यार्थ्यांसाठी त्यांनी शिक्षणाची फी पूर्णतः माफ केली आहे, आणि ज्यांच्या डोक्यावर पालकांचं छत्र नाही, अशा विद्यार्थ्यांना ६०% फी सवलत देण्यात येते.
प्रत्येक वर्षी भव्य बक्षीस समारंभ आयोजित करून गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव केला जातो. त्यांना एक मंच दिला जातो, जिथं केवळ शैक्षणिक यश नव्हे, तर त्यांच्या संघर्षाचं आणि मेहनतीचंही कौतुक होतं.
तसंच, ९वी ते १२वीच्या विद्यार्थ्यांनी इंग्रजी विषयात ८४ किंवा त्याहून अधिक गुण मिळवले, तर त्यांना १५०० रुपये रोख रकमेचं बक्षीस दिलं जातं. हे बक्षीस पालकांच्या उपस्थितीत दिलं जातं, जेणेकरून पालकांची सामाजिक प्रतिष्ठा वाढते आणि पाल्यांमध्ये आत्मभान जागृत होतं. अभ्यासात रस निर्माण करून, शिक्षणाची गोडी लावणारे प्रा. प्रकाश पाटील हे विद्यार्थ्यांसाठी एक जिवंत प्रेरणा आहेत.
परंतु, त्यांच्या आयुष्यातील एक छोटा कोपरा अजूनही रिकामा आहे—जीवनसाथीचा. प्रकाश सर अजूनही अविवाहित आहेत. शिक्षण, आर्थिक स्थैर्य, निष्ठा आणि आदर्श माणूसपणा असूनही, समाजाने त्यांच्या अपंगत्वाला बंधन मानलं आहे. शरीरापुरती मर्यादा पाहून मनाची समृद्धी दुर्लक्षित होते. आजच्या जलदगती जीवनात अनेकांची नजर फक्त बाह्य ठसक आणि भौतिक संपत्तीवरच असते, तर मनापासून प्रेम आणि आधार यांना मोल कमी केलं जातं.
प्रकाश सर म्हणतात, “पाय नाहीत म्हणून काय झालं, मन अजूनही चालतंय… आणि तेच मला पुढे नेतंय.”
ते अजूनही लेखणीने लिहित आहेत, शिकवत आहेत आणि जगण्याचा मंत्र देत आहेत. त्यांच्या उत्तम वागणुकीतून समाजाला एक प्रेरणादायी संदेश जातो— अपूर्णतेतही एक अद्भुत पूर्णता संभवते.

एक साद आणि विनवणी:

प्रिय मुलींनो,
जोडीदार निवडतांना फक्त गाडी, बंगला, पैसा यांच्यावर लक्ष केंद्रित करू नका. हृदयाला एकदा शांतपणाने जाणून घ्या—कुठे तिथे कोणी निर्मळ, खर्‍या प्रेमाचं डोळे लावून टाकणारं व्यक्तिमत्त्व तुमच्यापुढे उभं आहे का? प्रकाश सरसारखा माणूस, जो स्वतःच्या कष्टाने उभा आहे आणि इतरांना उभं करतो आहे; अशा माणसासोबत जुळणं तुमचं जीवन सोनफुलांनी नटेल हे नक्की.

“जगणं सुंदर कपड्यांनी नव्हे, तर सुंदर माणसांनी सुंदर होतं.”
“माणूस शरीराने अपूर्ण असू शकतो, पण मनाने, प्रेमाने, आत्म्याने पूर्ण असतो.”

प्रकाश सर यांच्या जीवनाचा हा आदर्श आपल्या समाजाला प्रेमाचा, सहनशीलतेचा आणि खरी माणुसकीचा संदेश देतो. त्यांच्या उजेडात आपण सुद्धा जीवनाला नवी दिशा देऊया.

स्मशानभूमीत अघोरी कृत्य करून महिलांच्या फोटोवर काळी जादू, दोन तरुणांना ठोकल्या बेड्या (ठाण्यातील एका स्मशानभूमीत महिलांच्या फोटोवर काळी जादू करतानाचा दोन तरूणांचा व्हिडिओ व्हायरल झाला. यानंतर त्यांना पोलिसांनी अटक केली.)
आमदार अनिल पाटलांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त सर्व स्तरातून झाला शुभेच्छांचा वर्षाव मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्रीसह राज्य भरातील नेत्यांनी दिल्यात शुभेच्छा, विविध समाजपयोगी कार्यक्रमांनी रंगला सोहळा
भक्तिरसात न्हालं संत गजानन महाराज मंदिर आषाढी एकादशीला उत्साहाची लहर!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed