
गांधलीपुरा परिसरात दूषित पाणीपुरवठा; नागरिक म्हणतात – आता आमचं आरोग्य धोक्यात! क्रांती दिनी धरणे, स्वातंत्र्य दिनी तीव्र आंदोलनाचा इशारा!
गांधलीपुरा परिसरात दूषित पाणीपुरवठा; नागरिक म्हणतात – आता आमचं आरोग्य धोक्यात!
क्रांती दिनी धरणे, स्वातंत्र्य दिनी तीव्र आंदोलनाचा इशारा!
अमळनेर प्रतिनिधी
गांधलीपुरा परिसरातील दर्गा अली मोहल्ला येथील मस्जिद मागील गल्लीत गेल्या अनेक महिन्यांपासून दूषित नळपाणीपुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या संदर्भात नागरिकांच्या वतीने अल्लामा फ़ज़ले हक़ खैराबादी (रहें.) स्टडी सेंटर & पब्लिक लाइब्रेरी चे अध्यक्ष मौलाना रियाज़ शेख यांनी अमळनेर नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांकडे तातडीने कारवाईची मागणी करणारे निवेदन सादर केले.
या निवेदनात म्हटले आहे की, सदर मोहल्ल्यातील नळांमधून येणारे दूषित व दुर्गंधीयुक्त पाणी आरोग्यविषयक गंभीर समस्या निर्माण करत असून, लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांची प्रकृती धोक्यात आली आहे. यापूर्वी देखील ६ डिसेंबर २०२४ रोजी निवेदन देण्यात आले होते, मात्र आजपर्यंत नगरपरिषदेने याची कोणतीही दखल घेतलेली नाही, अशी तक्रार करण्यात आली आहे.
या भागात वस्ती वाढलेली असून जुनी ३ इंची पाण्याची पाइपलाइन जुनी, गळतीची व अपुरी झालेली आहे. त्यामुळे तात्काळ ती काढून त्याऐवजी ४ इंची नवीन पाइपलाइन टाकण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदनात असा इशाराही देण्यात आला आहे की, जर लवकरात लवकर कारवाई करण्यात आली नाही, तर येत्या ८ ऑगस्ट रोजी ‘क्रांती दिना’च्या दिवशी धरणे आंदोलन करण्यात येईल व १५ ऑगस्ट २०२५ रोजी नगरपरिषदेसमोर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल, याची नोंद प्रशासनाने घ्यावी.
निवेदन देतांना त्रस्त नागरिकांची समस्या मांडतांना मौलाना रियाज़ शेख यांच्यासह अमजद भाई, लतीफ पठान, मनोज मोरे, अल्तमश शेख, बापू चौधरी, इमरान भाया, किरण पाटील, कमरोद्दीन शेख, बाबा शेख, ताहेर शेख, जहुर मुतवल्ली, निहाल पठान, धनराज पारधी, तसेच परिसरातील महिला नागरिक शमीरा बी, मुमताज शेख, रेहाना बी, मलेका शेख, सुल्तान मलीक,सरो बाई भीमराव, नंदिनी पांडुरंग, सारिका ढालवाले आदी उपस्थित होते.