

कल्याण येथे गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या अभिनव विद्यामंदिरचे जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांकडून कौतुक
ठाणे: कल्याण (मनिलाल शिंपी) लोकसहभागातून विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण देणाऱ्या छत्रपती शिक्षण मंडळाच्या अभिनव विद्यामंदिर शाळेचे ठाणे जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी ललिता दहितुले यांनी कौतुक केले.
ठाणे जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी ललिता दहीतुले तसेच उपशिक्षणाधिकारी छाया पराडके यांनी आज शाळेला भेट दिली. मराठी शाळेची विद्यार्थी संख्या घटत असली तरीही अभिनव शाळेच्या विद्यार्थी संख्येत मात्र लक्षणीय वाढ झाल्याबद्दल शिक्षण अधिकारी व उपशिक्षणाधिकाऱ्यांनी शाळेचे मुख्याध्यापक व सर्व सहकारी शिक्षकांचे तोंड भरून कौतुक केले. शाळेच्या गुणवत्तेबाबत अधिकाऱ्यांनी मुख्याध्यापक संपत गिते यांसोबत यथासांग चर्चा केली. निरनिराळ्या सामाजिक संस्था व देणगीदारांच्या माध्यमातून मुख्याध्यापक व सहकाऱ्यांनी शाळेमध्ये अनेक उपयुक्त बदल केले आहे. संपूर्ण शाळा डिजिटल करण्यात आलेली आहे, इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत शिकवणी वर्ग व विद्यार्थी दत्तक योजना या शाळेमध्ये लागू करण्यात आलेल्या आहेत, लिखाण व वाचनात अडचणी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुट्टी कालावधीत विशेष गम्मत वर्ग नियमितपणे घेतले जात आहेत, विविध बाह्य परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे, माजी विद्यार्थ्यांच्या मार्फत शाळेला सुंदर रंग देण्यात आलेला आहे तसेच विद्यार्थ्यांच्या गणवेशाची सुद्धा सोय करण्यात आली आहे. शाळेच्या या सर्व उल्लेखनीय बाबींमुळे अभिनव शाळा ही इतर शाळांसाठी प्रेरणादायी ठरेल असे शिक्षण अधिकारी ललिता दहीतुले यांनी प्रतिपादन केले.अधिकाऱ्यांनी शाळेचे मुख्याध्यापक संपत गिते,पर्यवेक्षक अरुण आवटे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची समक्ष भेट घेऊन त्यांचे अभिनंदन व कौतुक केले.
