

समाजात शिरलेले वस्सकार ओळखून धम्माचे रक्षण करा
– डोंबिवली येथील राज्यस्तरीय बौद्ध धम्म परिषदेत भरत शिरसाठ यांचे प्रतिपादन
……………………………………….
अमळनेर प्रतिनिधी
ज्याप्रमाणे वज्जी गणराज्य संपविण्याकरिता मगध राजा अजातशत्रू याने मंत्री वस्सकार च्या मदतीने वज्जी गणराज्यातील लोकांमध्ये फूट पाडली. त्यांच्यामध्ये भेद निर्माण केले आणि वज्जी गणराज्य पराभूत केले. त्याप्रमाणे आज भारतामध्ये बुद्ध धम्माला संपविण्याकरीता वस्सकार सारखे कारस्थानी- भेदी प्रस्थापित व्यवस्थेमार्फत निर्माण केले जात असल्याचे प्रतिपादन बौद्ध साहित्य प्रसार संस्थेचे केंद्रीय महासचिव प्रा. भरत शिरसाठ यांनी राज्यस्तरीय बौद्ध धम्म परिषदेमध्ये डोंबिवली येथे केले.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री मा. रामदास आठवले, धम्म परिषदेचे अध्यक्ष प्राध्यापक शुक्राचार्य गायकवाड, पूज्य महाथेरो भंते ज्ञानज्योती, धम्मपदाचे लेखक मा. डी. एल. कांबळे, मा. अनोमदस्सी धम्माचारी यांची प्रमुख उपस्थिती होती. राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर बौद्ध धम्म उपासक आणि उपासिका सदर धम्म परिषदेमध्ये उपस्थित होते.
‘बुद्ध धम्म एक महाक्रांती’ या विषयावरील परिसंवादात प्रमुख वक्ते म्हणून बोलताना प्रा. भरत शिरसाठ म्हणाले की तथागत गौतम बुद्धांच्या काळात मगध साम्राज्याच्या उत्तरेला वज्जी गणराज्य होते. या वज्जी गणराज्याच्या लोकांमध्ये प्रचंड एकता आणि सामंजस्य होते. मगध साम्राज्याचा राजा अजातशत्रू याला मात्र वज्जी गणराज्यावर आपले प्रभुत्व प्रस्थापित करायचे होते. अनेक प्रयत्न करून सुद्धा अजातशत्रूला यश येत नव्हते. अशा परिस्थितीमध्ये अजातशत्रू याने आपला मंत्री वस्सकार याच्या मदतीने वज्जी लोकांमध्ये फूट पाडली. त्यांच्यामध्ये भेद निर्माण केले. हेवेदावे निर्माण केले आणि नंतर वज्जी वर आक्रमण करून वज्जी जिंकून घेतले. सध्या प्रचंड प्रगतीपथावर असणाऱ्या भारतातील बुद्ध धम्मामध्ये असे वस्सकार घुसळवून बुद्ध धम्माचे मूळ तत्त्वज्ञान संपविण्याचे कार्य मनुवादी व्यवस्थेमार्फत सुरू आहे. म्हणून अशा लोकांपासून धम्माचे रक्षण करणे ही काळाची गरज आहे. समाजाने त्यासाठी सतर्क राहिले पाहिजे, असे आपल्या अर्ध्या तासाच्या व्याख्यानात भरत शिरसाठ यांनी मांडले. कार्यक्रम प्रसंगी स्मृतीचिन्ह देऊन व्याख्याते भरत शिरसाठ यांना गौरविण्यात आले.