विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत “स्वच्छ वारी- हरित वारी” उपक्रम
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत “स्वच्छ वारी हरित वारी” उपक्रम राबविण्यात आला. संत सखाराम महाराज यांच्या आषाढी वारीस प्रारंभ होत असल्याने या निमित्ताने तुळशीबाग येथे आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला. या उपक्रमात धनदाई कला व विज्ञान महाविद्यालयाच्या 20 तसेच प्रताप महाविद्यालयाच्या 20 स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. वारी अनुभवण्याबरोबरच वारीचा मार्ग स्वच्छ करणे तसेच परिसर प्लास्टिक व थर्माकोल मुक्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सेवा दिली.
याप्रसंगी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलसचिव डॉ विनोद पाटील, विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे मुख्य कार्यक्रम अधिकारी डॉ सचिन नांद्रे, विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ संदीप नेरकर, जिल्हा समन्वयक डॉ. दिनेश पाटील, विभागीय समन्वयक डॉ दिलीप गिरे, डॉ मनीष करंजे, प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अरुण जैन, धनदाई महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ लिलाधर पाटील डॉ. शैलेश पाटील, रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ हेमंत पवार आदी मान्यवर उपस्थित होते. “विद्यार्थ्यांना सांस्कृतिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या वारीचा अनुभव घेता यावा तसेच या निमित्ताने पर्यावरण पूरक वारी देखील करता यावी म्हणून हा उपक्रम असल्याचे” डॉ. नांद्रे यांनी याप्रसंगी सांगितले. विद्यार्थी स्वयंसेवकांनी यात उत्स्फूर्त सहभाग घेत आपली सेवा दिली तसेच वारीचा आनंद देखील घेतला.