• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

मारकडवाडीतील दडपशाहीतून ईव्हीएम संशयाचे आंदोलन अधिक भडकणार!*, *संजय एम.देशमुख, ( निंबेकर)*,*ज्येष्ठ पत्रकार,अकोला.* *मोबा.क्र. ९८८१३०४५४६*

Dec 4, 2024

Loading

*मारकडवाडीतील दडपशाहीतून ईव्हीएम संशयाचे आंदोलन अधिक भडकणार!*
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
*संजय एम.देशमुख, ( निंबेकर)*,*ज्येष्ठ पत्रकार,अकोला.*
*मोबा.क्र. ९८८१३०४५४६*
=============================

भौतिक वाटचालीत सामाजिक,राजकीय आणि पारिवारीक जीवनासाठी व्यवहार आणि सेवा हा महत्वाचा भाग असला तरी सर्व वैयक्तिक तथा सामाजिक संबंध अबाधित ठेवण्यासाठी,सर्वांना एका माळेत गुंफून विखुरण्यापासून वाचवण्यासाठी विश्वास हा एक बळकट धागा असतो.तोच माणसांचा तारणहार आणि प्रबळ राष्ट्राच्या लोकशाहीचा बळकट आधार असतो.मानवी जीवनमुल्ल्यांचा अविभाज्य अंग असणारा तो विश्वास संशयाच्या चक्ररव्युहात कधी अडकू नये.त्यासाठी नैतिक जीवनमुल्ल्यांच्या राजमार्गावरून प्रवास करणारा प्रत्येक माणूस आपल्या वागण्याची,भुमिकांची आणि अढळ अस्तित्वाची खात्री देत असते.आपल्या अंतर्मनातील विश्वासाच्या भावनांना जागवून मी निरपराध आणि योग्य कसा याबध्दल प्रबळ विश्वासाच्या साक्षित्वाने स्वत:बध्दलची खात्री पटवून देत असतो.कारण तो या समाजरचनेतला लोकशाहीचा आदर करणारा, कर्तव्य आणि मानवतेशी प्रेमपूर्वक बांधिलकी जपणारा विधायक,सामाजिक आणि पारदर्शक माणूस असतो.‌…हे सारं लोप पावत आहे…! *हा येथील संस्कृती,संविधान आणि लोकशाहीचा सर्वात मोठा दैवदुर्विलास आहे….पक्ष,जाती आणि धर्माच्या भेदभावांना बळी पडणाऱ्या बांधवांनी हे सत्त्य समजून घेतलं पाहिजे. सध्याचा धुडगूस आणि स्वैराचार ही महाराष्ट्र आणि राष्ट्राच्या निरोगी समाव्यवस्थेची होणारी अपरिमित हानी आहे…!*

विश्वासाला जागणाऱ्या वर उल्लेखित निकोप व्यक्तिमत्वाची, अशाच प्रकारच्या सामाजिक आणि राजकीय धुरिणांची राष्ट्राला आज खरी गरज आहे.परंतू कर्तव्य आणि प्रामाणिकतेसोबत मानवी समुहाला एकसंघ ठेवणारा “विश्वास” च सध्या संकटात आला असून तो संशयांच्या लाटांमध्ये हेलकावे खात आहे. कारण या देशातील आणि आमच्या महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेते दिवसेंदिवस अधिक अनैतिक,मतलबी वृत्तीचे म्हणून सिध्द होत आहेत.जनतेच्या मनातील विश्वास त्यांनी गमावलेला आहे.राजकारणातून ऐश्वर्यसंपन्न जीवन जगण्यासाठी त्यांनी लोकशाहीला संकटात आणलेले आहे.या मनोवृत्तीनेच निवडणुक प्रक्रियांमधून आता मतदारांची मतं पळवण्याचा जनद्रोह सुध्दा सध्याच्या निवडणूकांमधून सुरू झाल्याच्या आरोळ्या लोकांकडून सुरू झालेल्या आहेत.यात आक्षेप घेऊन समोर येणारे आता फक्त पराजित उमेदवारच नाहीत.तर आपल्या मतांचा होणाऱ्या दुरूपयोगाच्या संशयाने या काही राजकीय पेंढाऱ्यांविरूध्द आता मतदारही मैदानात उतरणार आहेत.त्याची सुरूवात सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस मतदार संघातील मारकडवाडी गावातून झाली आहे. या गावकऱ्यांनी आमची ८० टक्के मते विजयी उमेदवार जानकरांच्या बाजूने झालेली असतांना,ईव्हीएम मधून एवढी कमी मत कशी? अशा प्रश्नातून चक्क निवडणूक आयोगाला आव्हान दिले आहे.त्यांच्या अमुल्य विश्वासाला अशा यंत्रणेच्या गैरकारभाराने तडा जाऊ नये म्हणून त्यांनी गावातून बॕलेटपेपरवर मतदानाची तयारी करून मतदान सप्रमाण सिध्द करून दाखविण्याची तयारी केली.परंतू “राजा बोले सरदार दल हाले” या न्यायाने, त्यांना स्वत:ला योग्य म्हणून सिध्द करण्याचा हक्क,तो त्यांचा मानवाधिकार प्रशासनकडून दडपशाहीने हिसकावला गेला‌.तिथे ३०० पोलिस तैनात करून मतदान घेतल्यास अटक करण्याच्या धमक्या देण्यात आल्या. दपडगीरी करणाऱ्या या यंत्रणेतील अधिकाऱ्यांना आता गावकऱ्यांनी कोणत्या कायद्याने कारवाई करणार होतात हे विचारून त्याचा न्यायालयामार्फत जाब विचारला पाहिजे.

महाराष्ट्रात विधानसभांच्या निवडणूका आटोपल्या आणि जादुई कांडीचे आश्चर्यकारक बाहे आणले.आजच शपथविधी होऊन राज्याचे मुख्यमंत्री,व दोन उपमुख्यमंत्र्यांची पदावर निवड होऊन ईतर मंत्र्यांचे शपथविधी पार पडणार आहेत.या सर्वांना महाराष्ट्रातील पत्रकार मित्रांकडून शुभेच्छा….! परंतू शपथा घेतांना त्यावेळी त्यांची अंतर्मनं सुध्दा त्यांना काही सांगणार आहेत,ते त्यांनी निश्चित ऐकावं.जनहितास्तव जगण्यासाठी,त्यांच्यावर होत असलेले अन्याय टाळण्यासाठी काही सुधारणा करण्याच्या प्रेरणा मिळाल्यात तर त्या निश्चित घ्याव्यात‌.गेल्या नोव्हेंबर महिण्यात प्रचारांच्या रणधुमाळीत चिखलफेकींच्या लाटा आणि पापांच्या कागदी नोटा अमर्याद बरसल्या. संविधानिक आणि लोकशाही मुल्ल्यांशी बेशरमपणाने प्रतारणा करीत झालेली कोट्यावधींची बरसात परदेशी चॕनेल्सनी टीपली.स्वत:ला जगातील समृध्द लोकशाहीवादी देश म्हणून श्रेष्ठत्वाची शेखी मिरवरणाऱ्यांना हिणवले‌. भारतातील लोकशाहीच्या या धिंडवड्यांची दखल घेतली,या असंविधानिक मर्कटलिलांची पोलखोल करीत खिल्ली उडवली‌.मतदानपूर्व आणि नंतरही अधिक सर्वेक्षणं हे महाआघाडीला अग्रेसर ठेऊन महायुतीचा पराभव सांगत होते. कारण त्यांच्या अनेक नेत्यांना आणि उमेदवारांना मतदारांनी आपल्या गल्ल्यांमधून हाकलून लावले होते. परंतू तरीही आश्चर्य म्हणजे हे अपमानित करून डावललेले अनेक उमेवारच विजयी कसे हे प्रश्न आता मतदारांना पडलेले आहेत.मतदारसंघात कुठेही निवडून येणाऱ्या खऱ्या उमेदवारांचाच बोलबाला होता. प्रत्यक्षात महाराष्ट्राच्या भुमित फिरणारे योगी,मोदी,शहा यांच्या प्रचार सभांमधून खाली दिसणाऱ्या खुर्च्या सुध्दा महाविकास आघाडीच्या विजयी अंदाजावर शिक्कामोर्तब करीत होत्या.परंतू २३ नोव्हेंबरच्या दिवसात बाहेर आलेले निकाल हे साऱ्या महाराष्ट्राला धक्का देणारे अनपेक्षित होते. अनेक ठीकाणी ईव्हीएममधील मतांची बेरीज ही त्या ठीकाणच्या एकून मतदानाच्या पुढे होती. उमेदवारांना स्वत:च्या घरातली पण मते पडलेली आढळत नव्हती.तर काही ठीकाणी एकाच चिन्हांवर जाणारे मतदान लक्षात येत होते.तक्रारीनंतर बटन दाबून अधिकारी सुरळीत करून आता झालं सुरू म्हणून मतदारांना अंदाजपंचे विश्वास देत होते. मशिनांची सिलं तुटलेली,त्यांचे स्पेअर भाग बाजुला पडलेले,अशा सुध्दा अनेक तक्रारी मतदार आणि कार्यकर्यांकडून झाल्या.या सर्व प्रकरणात निवडणूक आयोगाने सायंकाळी ५ नंतर वाढवून सांगीतलेल्या ७६ लाखाच्या अधिक मतदानाने या निवडणूक प्रक्रियेची दाणादाण उडवून दिली.संशयांना बळकटी मिळाली.याबाबत निवडणूक आयोगाकडून कोणतीही समर्पक स्पष्टीकरणे न मिळाल्याने सध्या महाराष्ट्र आणि याअगोदर झालेल्या संशयास्पद निवडणूक प्रक्रियेच्या चर्चा देशभर सुरू झालेल्या आहे.

एकंदरीत सर्व महाराष्ट्रभरात निर्माण झालेल्या सदोष निवडणूक प्रक्रियेतील संशयास्पद वातावरणाने आता सारा देशच ढवळून निघालेला आहे. *”हमे भी अपनोवालोने कब लूटा, की टाईम पर पता भी नही “* असे म्हणत * *”ईव्हिम हटाव और फिरसे बॅलेट पेपर लाव”* अशा प्रकारच्या आंदोलनांना,स्वाक्षरी मोहिमांना आता सुरूवात झाली आहे.महाराष्ट्राचे संशयाचे भूत आता हवेसोबत ईतर राज्यातही पोहचणार आहे. निवडणूक आयोगाच्या संशयास्पद भूमिकांचा पर्दाफाश करणारी प्रायोगिक ठीणगी सोलापूरमधील मारकडवाडी गावात पडली.त्यांच्या मतदानारूपी आंदोलनाला अदृश्य राजाच्या सुपर शक्तीने दडपून टाकण्याचा प्रयत्न केला.कारण यातून लबाडी उघड होण्याची,नाचक्की होण्याची शक्यता होती.आपला विश्वास मतदारा़ंमध्ये पुर्नस्थापित करायचा असेल तर अशा वेळी राजकीय नेत्यांनी न घाबरता पुढे आलं पाहिजे‌. स्वत:च्या नैतिकता आणि प्रामाणिकतेची ढोंगं वठवून ईतरांना दोषी ठरविणाऱ्या आणि जनतेवर अन्याय करणाऱ्यांनी या अग्निपरीक्षेला सामोरे गेलं पाहिजे….! निवडणूक आयोगालाही सर्व प्रश्नांची समर्पक स्पष्टीकरणं देण्याचे कर्तव्य पार पाडणे हेच जनतेला अपेक्षित आहे.कारण *”राजा राजा बोले,सरदार सुने”* अशी परिस्थिती आपण प्रशासनात निर्माण करून ठेवलेली आहेच.त्यामुळे ठीणगी तर पडली आता बंडं वाढणारच आहेत. *रामायणात विश्वासाला प्रबळ ठरवून स्वत:ची खात्री देण्यासाठी सितेने अग्निपरीक्षा दिली होती म्हणतात.मग तिच्या पतीच्या म्हणजे रामाच्या नावाचा दुरुपयोग करणारांनी आम्ही फक्त रामाच्या नावाचा बाजार केला.मतदारांच्या मतांचा अनादर केला नाही.कोणताही दुरुपयोग केला नाही हे सप्रमाण पटवून द्यावं.* ईतरांना जेलमध्ये टाकणारांनी स्वत:च्या अंतरंगाशी होऊ पाहणाऱ्या प्रतारणा टाळण्यासाठी जनतेच्या दरबारात सत्य पटवून द्यावं.

*रामाच्या सितेने अग्निपरीक्षा घेतली तशी त्या रामांच्या भक्तांनी पण स्वत:ला योग्य म्हणून सिध्द करावं.* असे कोणते प्रमाद घडू नयेत म्हणून यानंतरचं सर्व मतदान बॕलेटपेपरवरच होईल असे निर्णय घ्यावेत.श्रीरामांच्या परमभक्तांनी दिल्लीश्वरांसमोर जनतेचे हे प्रस्ताव मांडावेत.अशी महाराष्ट्रातील मतदारांची संशयास्पद रितीने विजयी झाल्याचा संशय असलेल्या सत्ताधाऱ्यांकडे ही मागणी आहे…! मतदारांवर झालेल्या अन्यायाविरूध्द बंड म्हणून आपल्या मतांचा विश्वास सप्रमाण सिध्द करण्यासाठी मारकडवाडीतील मतदारांनी बॅलेट मतदानाचा प्रयोग पुढे आणला. त्यांचा त्या लोकशाहीतील प्रयत्नाला लबाडी उघड होऊ नये म्हणून प्रशासनाकडून पोलिस बळाने दडपण्यात आले.आता मारकडवाडीतले एक बंड दडपले. *कोंबड्यांचे नरडे दाबल्याने क्रांतीचा सुर्य उगवायचा थांबणार नाही.* आंदोलने आता अधिक भडकणार,त्याची धग ईतर राज्यातही पोहचणार…!खऱ्या- खोट्याची परीक्षा जनतेच्या दरबारात आणि सृष्टीच्या कालचक्रालाही द्यावीच लागणार.म्हणून वेळीच सावध होण्याची सद्विवेकबुध्दी प्रभू श्रीरामांनी त्यांच्या धार्मिक भक्तांना द्यावी ही एक मानवतावादी प्रार्थना…! 🙏
============================

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *