• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

मानव मुक्तीचा जाहीरनामा ‌मांडणारा महापुरुष डॉक्टर भीमराव आंबेडकर…

Dec 6, 2024

Loading

देशाला मानवतेच्या वाटेने घेऊन जाणारा महापुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर !!!

‌‌ ‌ भारतात महापुरुष जन्माला आले. आपल्या समतेच्या विचारधारेने महापुरुषांनी देशामध्ये मानवतेचे बीज रोवले. सर्वप्रथम गौतम बुद्धांनी वैज्ञानिक क्रांती केली. चिकित्सेची जगात पायाभरणी केली. न्याय, स्वातंत्र्य, समता ,बंधुता ,करुणा ,विवेक,अहिंसा मानवत रुजवला. गौतम बुद्धांचा वैचारिक वारसा भारतात पुढे चालवला. डॉक्टर बाबासाहेबांचा जन्म जर झाला नसता तर बहुजनांना स्वातंत्र्याने जगता आले नसते.. कारण भारतात मानवतेला नष्ट करणारी मनुस्मृती बहुजनांवर अन्याय करीत होती. मनुस्मृती मानवतेला छेद देणारी होती. अशा मनुस्मृति विरुद्ध आवाज उठवण्याचे नीडरपणे धाडस तथागत सिद्धार्थ गौतमांनी केले. त्यानंतर महावीर, चक्रधर, बसवेश्वर, छत्रपती राजे, संत तुकाराम,महात्मा फुले , कबीर, रविदास,यांनी जगाला उन्नत करणारे ज्ञान जगाला दिले. अशा महापुरुषांच्या कृतज्ञतेसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतःचे देशाला जीवन समर्पित केले. आपल्या महापुरुषांचा वैचारिक वारसा पुढे चालवला. अशा थोर महापुरुषाचा जन्म १४ एप्रिल १८९१ ला झाला. वडील रामजी सकपाळ ब्रिटिश सैन्यात सुभेदार होते. वडिल कबीर पंथी होते. त्यामुळे विचाराची सुंदर बैठक त्यांच्या जीवनात होती. शिक्षणावर त्यांचा विश्वास होता. आपल्या भीमा साठी शिक्षण मिळावे यासाठी अतोनात कष्ट घेतले. जणू रामजी सकपाळ ज्ञान सूर्याला विकसित करण्यासाठी संधी उपलब्ध करून देत होते. स्वतःच्या मुलीचे दागिने विकून भिमाचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. महु खेड्यात हया ज्ञान सूर्याचा जन्म झाला. सहा डिसेंबर हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे. या दिवसाला असे म्हणतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोबर १९५६ ला बुद्ध धम्म स्वीकारला. बुद्ध धम्माचे बीज त्यांना माध्यमिक शिक्षण झाल्यावर मिळाले होते. स्व धर्मात म्हणजे हिंदू धर्मात जातिभेदाचे चटके सहन करावे लागले. हिंदु असताना आपल्या जातीच्या लोकांना मंदिरात प्रवेश दिला जात नव्हता. बहुजन लोकांना सार्वजनिक विहिरींवर पाणी भरू दिले जात नव्हते. गावातील पंगतीत अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या जातींना बसु दिली जात नव्हते. श्रेष्ठ ,कनिष्ठ असा भेद केला जात होता. मानवाला काळीमा लावणारे प्रकार घडत होते.अशा पशुहीन जीवनाला बहुजन कंटाळलेले होते. अशावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकांना आशेचा किरण दाखविला. मनुस्मृतीची व्यवस्था पालटून टाकली. एका गरीब कुटुंबातील महार समाजाच्या मुलांने आपल्या असामान्य प्रतिभेने जगाला दिपवून टाकले. जगाला दिशा देणारा प्रगल्भ प्रज्ञा सूर्य जन्माला आलेला होता.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहुजनांना कर्मकांडापासून मुक्ती मिळवून दिली. समाजाला शिक्षणाची द्वारे कायद्याच्या चौकटीतून खुली केली. जगाच्या प्रश्नावर भाष्य करणारा विद्वान जन्माला आला. तुझ्या समाजाला मनुस्मृतीने शिकू दिले नाही त्या समाजातील मुलगा भारत चालवणारा ग्रंथ लिहितो हे भूषणावह घडले. मानव मुक्तीसाठी संविधान हे एकमेव साधन आहे. बाबासाहेबांनी मागे पडलेला बुद्ध धम्म विवेकाच्या, चिकित्साच्या, विज्ञानाच्या वाटेवर आणला. त्यांना अपेक्षित असलेला बुद्ध धम्म आज लोक त्या विचाराने जगताना दिसत नाहीत. बुद्ध धम्मात वाढलेला कर्मकांडाचा, व्यक्ती पूजेचा प्रभाव हे बुद्ध धम्माला मागे खेचण्यात कारणीभूत ठरत आहे. डॉक्टर बाबासाहेबां सारख्या बोधिसत्वाने जगाला दिशा दिली. आज जगात बुद्ध धम्माची दीक्षा घेतलेले असंख्य भिकू,अनुयायी आहेत परंतु परिसरात तशी कोणतीही क्रांती दिसून येत नाही. सर्वच ज्ञानाच्या प्रांतात अग्रेसर असलेले बाबासाहेब आम्हाला समजलेच नाही. आजही आम्ही विविध संघटनांत गुंतून बसलो. आम्हाला तुकड्या तुकड्यात विभाजन करण्यात विरोधक यशस्वी झाले. आजही मागासवर्गीय समजल्या जाणाऱ्या जाती एकमेकांमध्ये श्रेष्ठ कनिष्ठ असा प्रकार मानतात. त्यामुळे ते एकत्र येणे शक्य नाही. काही संघटना केवळ पैसा जमा करतात परंतु पाहिजे तसे काम करताना दिसत नाही. अहोरात्र काम करणारे संघटन देशाला दिशा देऊ शकते. देशाच्या एकतेला, अखंडतेला जोडून ठेवेल असा पर्याय देशात दिसत नाही. एकाच देशात राहणारे विविध धर्माचे लोक एकत्रित नांदू नये हे विषमतावादी विचारसरणीची खेळी खेळली जात आहे. विविध धर्मांना जोडून ठेवणारा समतेचा दिवा अजून पेटलेला दिसत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देशाला एकत्रच ठेवण्यासाठी धर्मनिरपेक्ष संविधान देशाला दिलेले आहे. तरीही जातीवादी लोक देशात जातीय ,धर्मीय बंडाळी माजवत आहेत. राजकारणात वाढलेला जातीय द्वेष, अमाप पैसा वाटप हे लोकशाहीला बरबाद करण्याचे सूतोवाच आहे. आज सामान्य व्यक्ती कितीही गुणवान, बुद्धिवान, प्रज्ञाशील, प्रज्ञावान कसला तरी राजकारणात तो यशस्वी होऊ शकत नाही कारण राजकारणात पैसा हा महत्त्वाचा ठरला आहे. पैसा वाटप करण्यावर कुणाचाही वचक राहिला नाही. कायदा या ठिकाणी कुचकामी ठेवला आहे. लोकांची मानसिकता पैसे मिळल्याशिवाय ‌ मतदान करायचे नाही अशी झाली आहे. येथेच लोकशाहीचा पराभव झालेला आहे. अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची मानसिकताच संपत चाललेली आहे. प्रत्येक विभागात वाढलेला भ्रष्टाचार दिवसेंदिवस अधिक वाढत आहे. आज बाबासाहेबांचा स्मृतिदिन म्हणजेच महापरिनिर्वाण दिन… या दिवशी बाबासाहेबांची कृतज्ञता व्यक्त करायची असेल तर संविधानाला अपेक्षित काम करण्याची गरज आहे. संविधान राजकारणी आपल्या पद्धतीने बदलवीत आहेत. भांडवलदारांच्या विचारावर सरकार चालत आहे. सामान्य माणसांवर कर्ज बाकी असताना गुन्हे दाखल होत आहे. मोठमोठे व्यापारी बँक बुडवून विदेशात राहत आहे. सामान्य लोकांना जगणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत लोकशाहीला वाचवणे हीच बाबासाहेबांना आदरांजली आहे.

सोपान भवरे
उपसंपादक
लेखन मंच साप्ताहिक
अमळनेर
.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *