जादा किंमतीच्या आणि नकली औषधांनी समाजस्वास्थ धोक्यात…!
अन्न व औषध प्रशासनाची तपासणीतील मतलबी दिरंगाई
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार!
अकोला……वाममार्गाने पैसा कमावण्यासाठी स्वतःचे माणूसपण विसरून मानवतेशी प्रतारणा करणाऱ्या आरोग्य क्षेत्रातील अपप्रवृतींनी समाजातील लोकांच्या आयुष्याची सौदेबाजी सुरू केलेली आहे.या क्षेत्रातील औषधांचे शासकीय पुरवठादार,विक्रेते आणि आर्थिक महत्वांकांक्षांनी आरोग्य क्षेत्राचा बाजार करणाऱ्या काही डॉक्टरांनी समाजाशी बेइमानी करत लोकांच्या खिशांवर आर्थिक डल्ले मारण्याचे काळे कारनामे सुरू केलेले आहेत. अस्तित्वातच नसलेल्या देशातील अनेक बनावट कंपन्यांकडून या नकली औषधांचे पुरवठे होत असून ही अत्यंत संतापजनक बाब आहे. शासन आणि सर्वसामान्न्यांना लूटून आडमार्गाने पापाची माया कमावण्यासाठी रूग्णांचे स्वास्थ संकटात आणण्याचे क्रूर फंडे या अनैतिक साखळीने सुरू केल्याची माहिती पुढे येत आहे.
औषध कंपन्याकडून पुरवठादार आणि सरळ मार्गाने डॉक्टरांना सुध्दा औषधांच्या पॅकेटवर आणि बॉटल्सवर पाहिजे त्या दरांची एम.आर.पी प्रिन्टसह देण्याची आश्वासने दिली जातात.यासाठी आर्थिक
हितसंबंधांपासून तर परदेशात वेगवेगळ्या सोई सुविधा पुरविल्या जातात याचेही शोध आरोग्य क्षेत्रातील माहितगारांकडून मिडीया प्रतिनिधींनी लावलेले आहेत.अवाजवी किंमतीची आणि नकली औषधे बाजारात,शासकीय आणि खाजगी रूग्णालयांना पाठविली जातात. प्रचंड किंमतीतून लूटमार तर होत आहेच.परंतू प्रत्येक जिल्ल्ह्याच्या ठीकाणी उतरणाऱ्या औषधांचे नमुने घेऊन ते लॕबमधून प्रमाणित करून घेण्याची कर्तव्य बांधिलकी सुध्दा पार पाडली जात नाही. दक्षता घेण्याचीही संवेदनशिलता अन्न व औषध प्रशासन विभागाकडे उरली नसल्याने पैसे खर्च करून वरून मृत्यूलाही निमंत्रण देण्याची संकटे समाजावर ओढवलेली आहेत.
औषधांचे पुरवठादार आणि राज्यभरातील अन्न व औषध प्रशासनाचे मतलबी साटेलोटे हे या भयानक प्रकरणातील मुख्य कारण असल्याचे समजते. समाजजीवनाचे हे असे मारेकरी जागोजागी निर्माण होणे हे एक मोठे सामाजिक दुर्दैव आहे.म्हणून महाराष्ट्र शासनाने या प्रकरणांची गंभीर दखल घेऊन अन्न व औषधे प्रशासन विभाग,पुरवठादार,आणि बेकायदेशीर कंपन्यांच्या चौकशा करून कार्यवाही करावी.प्रत्येक विभाग आणि जिल्ल्ह्याच्या ठीकाणी ही औषधे बाजारपेठा आणि रूग्णालयांमध्ये पसरण्याअगोदर त्यांचे नमुने घेऊन प्रमाणिकीकरण का केले जात नाही याचा शोध घ्यावा.समाजस्वाथ्यावरील भयानक संकटाचे निराकरण करण्यासाठी या प्रकरणी प्राधान्याने लक्ष घालावे. अशी मागणी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेने मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री तथा राज्य आयुक्तांकडे केली आहे.
लोकस्वातंत्र्यचे संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख यांनी पाठविलेल्या पत्रातून ही मागणी केली .तसेच अकोला जिल्ह्यासाठी लोकस्वातंत्र्य सामाजिक सेवा संघ या कक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय कृष्णराव देशमुख यांनी अकोला जिल्हाधिकारी,अन्न व औषध प्रशासनाच्या जिल्हा स्तरावरील अधिकारी आणि विभागीय आयुक्तांना या बातमीची पत्रे सादर केली आहे. अशाच मागण्या लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांनी सुध्दा आपल्या संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेनांव्दारे कराव्यात असे आवाहन संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख यांनी केले आहे.
रूग्णांच्या जीवांचा खेळ मांडणाऱ्या या भरमसाट किंमतीच्या आणि काही नकली औषधांचे साठे अलिकडेच पकडले गेले आहेत.ही प्रकरणेच औषधी व आरोग्य व्यवसायातील या मतलबी काळ्या बाजारातील यमदुतांच्या चोरट्या मार्गाचे काळे वास्तव दर्शविणारी असून याची पाळेमुळे शासनाने खोदून काढली पाहिजेत.पैसा कमावण्याच्या अघोरी वाम मार्गाने समाजातील लोकांची आयुष्येच हिरावण्याचे राक्षसी प्रयोग होत आहेत.त्याला मानवी जीवनमुल्ल्ये हरविलेल्या काही डॉक्टर नामक पांढऱ्या डगल्यातील अनैतिक काळ्या यमदुतांचाही मोठा सहभाग आहे. अशा संकटजनक परिस्थितीला नियंत्रणात आणावे. जिल्हा आणि विभागीय पातळीवर प्रशासनाला यासाठी सक्रीय करावे अशी सामाजिक अपेक्षांची मागणी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाने व्यक्त केली आहे.
============================