• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

आरोग्य व औषधी क्षेत्रातील अनैतिकांचे समाजस्वास्थावरच आक्रमण…!* , *संजय एम.देशमुख* *(निंबेकर),ज्येष्ठ पत्रकार,अकोला* *मोबा.क्र ९८८१३०४५४६*

Dec 12, 2024

Loading

*आरोग्य व औषधी क्षेत्रातील अनैतिकांचे समाजस्वास्थावरच आक्रमण…!*

*संजय एम.देशमुख* *(निंबेकर),ज्येष्ठ पत्रकार,अकोला*
*मोबा.क्र ९८८१३०४५४६*
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

समाजातला माणूस संकटातून,असाध्य व्याधीतून वाचला पाहिजे,त्याला उत्तम स्वास्थ लाभले पाहिजे.कारण त्याचे शरीरस्वास्थ ही त्याची संपत्ती तर असतेच, तो राष्ट्रसंपदेचाही सहयोगी सभासद असतो.म्हणून त्याला जीवनसुरक्षा देण्याच्या उदात्त उध्दीष्टाने विज्ञान,तंत्रज्ञान,प्राचिन योगविद्या,अॕलोपॕथी आणि आयुर्वेद औषधोपचार आहेत.त्या माध्यमातूनच अनेक मानवतावादी सेवाव्रती त्याला दिर्घायुष्य बहाल करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असतात.मात्र दुसरीकडे नियतीकडून मानवी जीवनाच्या प्राप्त संधीचं सोनं करण्याची सद्बुध्दी अनेकांकडे नसते.म्हणून असे अनैतिक नराधम मानवी जीवनमुल्ल्यांना हरवून भौतिक आयुष्याचा प्रवास करत असतात. त्यांना समाजातला माणूस मेला तरी चालेल परंतू त्यांच्या ऐशोरामासाठी पापाच्या कमाईतून त्या प्रेतांच्या टाळूवरील लोणी त्यांना खाता आलं पाहिजे. या कुविचारांनीच चालणाऱ्या त्या अमानुष प्रवृत्ती असतात.असे काही लूटारू गल्लेभरू आरोग्य क्षेत्रात निर्माण झाल्याने नकली औषधांचा पुरवठा करणारे काळे कलूटे जादुगार सुध्दा या कळपात सहभागी आहेत.

वाममार्गाने पैसा कमावण्यासाठी स्वतःचे माणूसपण विसरून मानवतेशी प्रतारणा करणाऱ्या आरोग्य क्षेत्रातील अपप्रवृतींनी समाजातील लोकांच्या आयुष्याची सौदेबाजी सुरू केलेली आहे.या क्षेत्रातील औषधांचे शासकीय पुरवठादार,विक्रेते आणि आर्थिक महत्वांकांक्षांनी आरोग्य क्षेत्राचा बाजार करणारे काही डॉक्टरही सहभागी आहेत. समाजाशी बेइमानी करत लोकांच्या खिशांवर आर्थिक डल्ले मारण्याचे काळे कारनामे त्यांनी सुरू केलेले आहेत. अस्तित्वातच नसलेल्या देशातील अनेक बनावट कंपन्यांकडून या नकली औषधांचे पुरवठे होत असून ही अत्यंत संतापजनक बाब आहे.शासन आणि सर्वसामान्न्यांना लूटून आडमार्गाने पापाची माया कमावण्यासाठी रूग्णांचे स्वास्थ संकटात आणण्याचे क्रूर फंडे या अनैतिक साखळीने सुरू केल्याची माहिती पुढे येत आहे.
औषध कंपन्याकडून पुरवठादार आणि सरळ मार्गाने डॉक्टरांना सुध्दा औषधांच्या पॅकेटवर आणि बॉटल्सवर पाहिजे त्या दरांची एम‌.आर.पी प्रिन्टसह देण्याची आश्वासने दिली जातात.यासाठी आर्थिक
हितसंबंधांपासून तर परदेशात वेगवेगळ्या सोई सुविधा पुरविल्या जातात याचेही शोध आरोग्य क्षेत्रातील माहितगारांकडून मिडीया प्रतिनिधींनी लावलेले आहेत.अवाजवी किंमतीची आणि नकली औषधे बाजारात,शासकीय आणि खाजगी रूग्णालयांना पाठविली जातात. यामध्ये प्रचंड किंमतीतून लूटमार तर होत आहेच.परंतू प्रत्येक जिल्ल्ह्याच्या ठीकाणी उतरणाऱ्या औषधांचे नमुने घेऊन ते लॕबमधून प्रमाणित करून घेण्याची कर्तव्य बांधिलकी सुध्दा पार पाडली जात नाही. दक्षता घेण्याचीही संवेदनशिलता अन्न व औषध प्रशासन विभागाकडे उरली नसल्याने पैसे खर्च करून वरून मृत्यूलाही निमंत्रण देण्याची संकटे समाजावर ओढवलेली आहेत.

मराठवाड्यात अंबाजोगाई आणि काही ठीकाणी नकली औषधांचे साठे रूग्णालयातून हस्तगत करण्यात आल्याच्या खळबळजनक घटना गेल्या आठवड्यात घडल्या आहेत.औषधांचे पुरवठादार आणि राज्यभरातील अन्न व औषध प्रशासनाचे मतलबी साटेलोटे हे या भयानक प्रकरणातील मुख्य कारण असलेच पाहिजे.त्याशिवाय अशाप्रकारे लोकांची आर्थिक लूबाडणूक करून हरामाच्या पैशांसाठी त्यांच्या स्वास्थ्याशी खेळण्याचे प्रकार एवढे बिनदिक्कत चालू शकत नाहीत.काही खाजगी कंपन्या ,ठेकेदार,डॉक्टर्स आणि प्रशासनातील अनैतिक प्रवृत्ती समाजजीवनाचे मारेकरी ठरत आहेत.असे माणसांना मारणारे लूटारू जागोजागी निर्माण होणे हे एक मोठे सामाजिक दुर्दैव आहे.म्हणून महाराष्ट्र शासनाने या प्रकरणांची गंभीर दखल घेऊन अन्न व औषधे प्रशासन विभाग, पुरवठादार, आणि बेकायदेशीर कंपन्यांच्या चौकशा करून तातडीने कार्यवाही केल्या पाहिजेत. ज्या आरोग्यमंत्र्यांच्या कार्यकाळात असे नीतिमत्ताहिन ठेकेदार नेमण्यात आले,त्या मंत्र्यांची आणि संबंधित अधिकाऱ्यांच्याही चौकशा झाल्या पाहिजेत.प्रत्येक विभाग आणि जिल्ह्याच्या ठीकाणी ही औषधे बाजारपेठा आणि रूग्णालयांमध्ये पसरण्याअगोदर त्यांचे नमुने घेऊन प्रमाणिकरण का केले जात नाही याचा शोध घ्यावा.समाजस्वाथ्यावरील भयानक संकटाचे निराकरण करण्यासाठी या प्रकरणी प्राधान्याने लक्ष घालावे‌.अशीच मागणी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेने सुध्दा मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री तथा राज्य आयुक्तांकडे केली आहे.

रूग्णांच्या जीवांचा खेळ मांडणाऱ्या या भरमसाट किंमतीच्या आणि काही नकली औषधांचे साठे राज्यात अजून कुठे कुठे पसलरले आहेत,याची शोधमोहिम आता जलदगतीने राबविली गेली पाहिजे. उघडीकीस आलेली ही प्रकरणे आता पुढे आली.परंतू आरोग्यक्षेत्रातून नेहमीच होत असलेली लूटमारीचे कारनामे औषधी व आरोग्य व्यवसायातील अशा काही क्रूर कर्म्यांच्या चोरट्या मार्गाचे काळे वास्तव दर्शविणारी आहेत.याची पाळेमुळे शासनाने खोदून काढली पाहिजेत.पैसा कमावण्याच्या अघोरी
वाममार्गाने समाजातील लोकांची आयुष्येच हिरावण्याचे राक्षसी हे प्रयोग सुरू आहेत.त्यात मानवी जीवनमुल्ल्ये हरविलेल्या काही डॉक्टर नामक माणसांचाही मोठा सहभाग आहे. अशा या संकटजनक परिस्थितीला नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न अविरत सुरू राहिले पाहिजेत.

ऐशोरामी भौतिक जीवनात वासनांध होऊन बिघडलेली माणसं ईतरांच्या स्वास्थाला हानी पोहचवून पापाची माया ओरबाडण्यात किती लिप्त असतात याच्या अनेक क्रूर घटना आरोग्य क्षेत्रात आज घडत आहेत.हा आडमार्गाचा प्रवास करणारांना मानवतावाद आणि त्यातील अंतर्भूत जीवनमुल्ल्यांचे प्रबोधन करणे म्हणजे पालथ्या घडयावर पाणी टाकण्यासारखे असते.म्हणून अशा अपप्रव‌त्तींवर वारंवार कायद्यांचे बडगे उगारून त्यांना गारद करणे,प्रशासनातील बेईमान प्रवृत्तींना हाकलणे क्रमप्राप्त आहे. मुलभूत सुविधांमध्ये आरोग्यसेवा आणि तिला सहाय्यभूत ठरणारी औषधी निर्माण आणि पुरवठा सेवा तेवढीच महत्वाची आहे.त्याठीकाणी आता काही उघड झाले म्हणून एवढ्यापुरतेच नको,तर शासन प्रशासनाचे अविरत लक्ष असले पाहिजे.आरोग्य आणि औषधी क्षेत्राच्या,खाजगी आणि सरकारी रूग्णालयांच्या कठोर तपासण्या सुरू राहिल्या पाहिजेत.उपचारांचे दर,सेवाप्रणाली,स्वच्छता आणि प्रशासनिक अंमलबजावण्यांसाठी कठोर निकष लावले पाहिजेत.त्याच्या अंमलबजावणीवरही सुक्ष्म अवलोकनासाठी स्वतंत्र यंत्रणा असली पाहिजे.तरच आरोग्य सेवेसाठी खर्च होणाऱ्या करोडो रूपयांचा खर्चाचा योग्य विनायोग होईल आणि समाजही शासनाच्या कल्याणकारी सेवेवर समाधानी राहिल…!
===========================

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *