*प्रताप महाविद्यालयात सेवानिवृत्त प्राध्यापकांचे स्नेहमिलन संपन्न*
——————————————–
● वाणिज्य विभागाचा उपक्रम
● आपल्या घरट्याकडे परतीचा एक
हळवा प्रवास
● जेष्ठ प्राध्यापकांनी साधला संवाद
———————————————-
अमळनेर : येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप कॉलेज अंतर्गत वाणिज्य विभागात सेवानिवृत्त प्राध्यापकांचे स्नेह संमेलन 27 फेब्रुवारी 2025 रोजी पार पडले.
झाड कितीही जुने झाले, तरी त्याच्या फांद्या ज्या मातीने वाढवल्या, त्या मातीचा ओलावा त्याच्या मुळांना सदैव हवासा वाटतो. शिक्षक हीच ती वटवृक्षाची सावली, जिच्या अंगाखांद्यावर पिढ्यान् पिढ्या ज्ञान घेऊन मोठ्या झाल्या. पण सेवानिवृत्तीचा वळणावर ही सावली दूर होते, आणि मग ती जागा रिकामी राहते… विद्यार्थ्यांच्या गजबटाने भरलेल्या त्या वर्गखोल्या मग त्यांच्याशिवाय सुन्न होतात.
प्रताप महाविद्यालय (स्वायत्त), अमळनेर च्या वाणिज्य व व्यवस्थापन प्रशाळेने आपल्या सेवानिवृत्त प्राध्यापकांना त्यांच्या घरट्यात पुन्हा आणण्यासाठी एक हृदयस्पर्शी स्नेहमिलन व सन्मान सोहळा आयोजित केला. हा सोहळा केवळ सत्कारापुरता मर्यादित नव्हता, तर तो त्यांच्या आठवणींना उजाळा देणारा, जुन्या नात्यांना पुन्हा एकत्र आणणारा आणि त्यांना आपण अजूनही महाविद्यालयाच्या अविभाज्य भाग आहोत, ही जाणीव करून देणारा होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. प्राचार्य डॉ. ए. बी. जैन होते. या सोहळ्याची सुरुवात ई-कॉमर्सचे पुस्तक, प्रतापीय, डस्टर, खडू, की-बोर्ड आणि माऊस पूजनाने झाली—कारण हाच तो प्रवास, ज्यातून हजारो विद्यार्थी घडले. त्यानंतर सेवानिवृत्त प्राध्यापकांचे शाल व गुलाब पुष्प देऊन जिव्हाळ्याने स्वागत करण्यात आले. जणू गुरुकुलातील गुरू पुन्हा आपल्या विद्यार्थ्यांमध्ये आले होते.
या भावनिक सोहळ्यात प्रताप महाविद्यालयात सेवा देऊन निवृत्त झालेले उत्तर महाराष्ट्रातील वाणिज्य शाखेचे पहिले Ph.D झालेले प्रा. डॉ. जी.डी.फेगडे सर (गोपीराजदादा बीडकर उपाख्य), प्रा.आर.आर.बहुगुणे सर, प्रा. एम. पी. देशपांडे सर, प्रा. के. यु. नाबरिया सर, प्रा. डी. एस. लोहार सर, प्रा. एस. बी. सोनार सर, प्रा. आर. पी. बडगुजर सर आणि प्रा. डॉ. एस. ओ. माळी सर यांच्या अमूल्य योगदानाचा गौरव करण्यात आला तसेच त्यांच्या सोबत त्यांच्या अर्धांगिनींचा देखील सन्मान करण्यात आला.
त्यांच्या शिक्षणयात्रेतील अविस्मरणीय क्षणांना उजाळा मिळाला.
विशेष म्हणजे, या कार्यक्रमाला माजी विद्यार्थी आणि सध्या अ. भा. गरुड महाविद्यालय, शेंदुर्णीचे प्राचार्य असलेल्या डॉ. श्याम साळुंखे सर उपस्थित होते. आपल्या गुरूंच्या सत्काराचा साक्षीदार होणे, हा त्यांच्यासाठीही आनंदाचा क्षण होता.
वाणिज्य शाखेतील दिवंगत प्राध्यापकांच्या स्मृतीन्ना उजाळा देऊन त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
विविध सरकारी नोकऱ्यांमध्ये स्थान मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा देखील या दरम्यान सम्पन्न झाला. प्रा. डॉ.अनिल एस.झळके यांनी त्यांच्या नावांची घोषणा केली आणि मान्यवरांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. त्याचबरोबर प्रा. डॉ. बालाजी ए. कांबळे यांनी ‘कॉमर्स चॅम्पियन’ स्पर्धेचा निकाल जाहीर करत विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे प्रदान केली.
या संमेलनात सेवानिवृत्त प्राध्यापकांनी आपल्या स्मृतींना उजाळा दिला. “हा विभाग, हा वर्ग, हा कॉरिडॉर—इथे आमचे आयुष्य घडले, आणि आम्ही कित्येक पिढ्या घडवल्या,” असे सांगताना त्यांचा गळा दाटून आला. त्यांच्या मनोगतातून विद्यार्थ्यांनी केवळ शिकवणच नाही, तर शिक्षक आणि शिष्य यांच्यातील नाते किती खोल असते, हे अनुभवले.
अध्यक्षीय भाषणात खान्देश शिक्षण मंडळाचे चिटणीस आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. बी. जैन यांनी, “शिक्षक कधीही सेवानिवृत्त होत नाहीत. ते नेहमी आपल्या विद्यार्थ्यांच्या यशात जिवंत राहतात,” असे सांगत उपस्थितांचे आभार मानले. तसेच महाविद्यालयाची शैक्षणिक दिमाखदार वाटचाल देखील थोडक्यात विषद केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक महाविद्यालयाचे उपपप्राचार्य व वाणिज्य प्रशाळेचे संचालक प्रा. डॉ. योगेश व्ही. तोरवणे यांनी केले तर कार्यक्रमाचे समन्वयक म्हणुन प्रा. डॉ. ज्ञानेश्वर एम.मराठे यांनी यशस्वीपणे काम पाहिले.
“माणसाने माणसाशी माणसा सम वागणे” या प्रार्थनेने या भावनिक सोहळ्याची सांगता झाली.
हा केवळ एक सोहळा नव्हता, तर विद्यार्थ्यांनी व सहकाऱ्यांनी आपल्या गुरूंना पुन्हा घरट्यात परत आणण्याचा एक सुंदर प्रयत्न होता. या संमेलनातून विद्यार्थ्यांनी एक गोष्ट पुन्हा शिकली – गुरू कधीही विस्मरणात जात नाहीत, ते कायम आपल्या मनात असतात.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रसायनशास्त्र विभागाचे प्रा. संतोष दिपके, वाणिज्य विभागाचे प्रा. डॉ. किरण सूर्यवंशी, प्रा. डॉ. किरण भागवत,डॉ.अनिल झळके,डॉ.बालाजी कांबळे तसेच वाणिज्य व व्यवस्थापन प्रशाळेच्या सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका व प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.