राज्यातील शाळेतील ताप व तापमान अधिक वाढणार ! शाळेतील वातावरणाचा पारा वाढला!
मुंबई ( विशेष प्रतिनिधी उदय नरे )
महाराष्ट्र राज्यातील शालेय शिक्षण विभागाने नुकतेच पाच मार्च रोजी परिपत्रक काढले. या परिपत्रकानुसार राज्यातील सर्व शाळातील परीक्षा या 25 एप्रिल पर्यंत घेण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिलेले आहेत.
परीक्षेचे आयोजन वर्षा अखेरीस करण्याऐवजी लवकर केल्यामुळे विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी मिळणारा कालावधी कमी होतो तसेच प्रत्येक शाळेचे वेळापत्रक वेगवेगळे असल्याचे निदर्शनास येते राज्यातील सर्व शाळांमध्ये एक वाक्यता असावी व उपलब्ध वेळेनुसार पुरेपूर उपयोग विद्यार्थ्यांच्यासाठी व्हावा यासाठी संचालक,राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे. याचा संदर्भ देत शालेय शिक्षण विभागाने सर्व मुख्याध्यापकांना सूचना दिल्या आहेत.
यामुळे शाळेतील शिक्षक, विद्यार्थी व पालक हे संभ्रमा अवस्थेत पडलेले आहेत.शाळेतील वातावरण आधीच तापलेले आहे त्याचे मुख्य कारण म्हणजे महाराष्ट्रात कधी नाही ते यावेळी उष्णतेचे तापमान हे 40 डिग्री पर्यंत पोहोचलेले आहे.यामुळे उष्माघात किंवा उष्णतेचे अनेक विकार होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे शालेय शिक्षण विभागाच्या हे परिपत्रक येण्यापूर्वी प्रत्येक शाळेतील परीक्षा घेण्याचे अधिकार शाळा मुख्याध्यापक घेत असल्याने शक्यता एप्रिलच्या दुसऱ्या हप्त्यात परीक्षा या पूर्ण होत असत. आणि शाळेतील निकालाचे काम एप्रिल महिन्यात पूर्ण करून एक मेला निकाल जाहीर करत होते.परंतु आता परीक्षाच 25 एप्रिल पर्यंत चालू असल्यामुळे विद्यार्थ्यांचे रिझल्ट कधी करणार? हा प्रश्न शिक्षकांना पडलेला आहे शासनाचे तघलुकी फरमान आहे असे काही शिक्षकांचे म्हणणे आहे. या फर्मानामुळे शिक्षण विभाग काय करू शकते याची प्रचिती सर्वांना आलेली आहे.नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावनी करण्यासाठी एका ठिकाणी क्षमता वृद्धी प्रशिक्षण आयोजित करण्यात आलेले आहेत. त्यात दहावी,बारावीच्या परीक्षा आणि या परीक्षा असल्यामुळे परीक्षक आणि मॉडरेटर म्हणजे नियमकाची कामे शाळांमध्ये चालू आहे शाळेतील परीक्षा घ्यायची नियमाकाचे काम करायचे, इतर कामे करावी? असा प्रश्न शिक्षकांना पडलेला आहे.
सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते नववीच्या वार्षिक परीक्षा चाचणी 2 व नियतकालिक मूल्यांकन सन 2024 – 25 साठी वेळापत्रक शाळेने अवलंबण अवलंबण्याचे ठरवले तर यावर्षी विद्यार्थ्यांना आपल्या सुट्टीत कुठेही बाहेर जाता येणार नाही काही पालकांनी दोन महिने आधीच तिकिटाचे बुकिंग केल्यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंड पडण्याची शक्यता आहे. शिक्षकांना विद्यार्थ्यांचा निकाल लावण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. शिक्षण विभागाचे धोरण जरी चांगले असले तरी त्याचे अंमलबजावणी करण्यासाठी पुरेसा वेळ न दिल्यामुळे सर्वांना त्रास होणार आहे. यासाठी शालेय परिपत्रक जाहीर करण्यापूर्वी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी त्याचे नियोजन करणे आवश्यक आहे असे वरिष्ठ शिक्षका रेणुका मिश्रा यांनी आमच्या प्रतिनिधींना सांगितले तर विजय महाजन यांच्या मतानुसार शालेय शिक्षण विभाग जरी विद्यार्थ्यांच्या हितासाठी कोणतेही निर्णय घेत असले तरी त्या निर्णयात महत्त्वाचा घटक असलेला शिक्षक वर्ग यांना समावेश करून घेणे अत्यावश्यक आहे असे मत मांडले. क्षमता वृद्धी प्रशिक्षणामध्येच विद्यार्थ्यांची क्षमता व शिक्षकांची क्षमता याचा विचार करण्याची आज काळाची गरज आहे असे मत अनेक शिक्षकांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केले. उन्हाळी ताप आणि डोक्याला ताप अशी अवस्था शिक्षकांची व विद्यार्थ्यांची झाली. महाराष्ट्राच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार केला असता औरंगाबाद नागपूर, नाशिक, बूलढाणा,वर्धा तसेच कोकण विभागातही एप्रिल महिन्यात खूप ऊन असते मुंबईची अवस्था ही यापेक्षा वेगळी नाही यामुळे सर्व ताप कमी करण्यासाठी परीक्षेचे नियोजन करावे यासाठी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे साहेबांनी प्रयत्न करावे अशी अपेक्षा शिक्षक वर्गातून करण्यात येत आहे.