*प्रताप महाविद्यालयात जागतिक वन दिवस निमित्त वृक्षारोपण संपन्न*
———————————————–
अमळनेर : खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय, अमळनेर (स्वायत्त)च्या वनस्पतिशास्त्र विभागाने 21 मार्च रोजी जागतिक वन दिन निमित्ताने विशेष वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले. अभिनव प्रयोग करणारे वनस्पतीशास्त्र या विषयाचे विभागप्रमुख प्रा.जयेश साळवे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपप्राचार्य प्रा. डॉ.विजय तुंटे, प्रा.डॉ.अमित पाटील आणि प्रा.जे. सी.अग्रवाल यांनी वृक्षारोपण करून कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन केले. प्रस्तुत कार्यक्रमास प्राचार्य डॉ.अरुण जैन,प्रा.पराग पाटील,डॉ.धीरज वैष्णव यांनी सहकार्य केले.
प्रस्तुत कार्यक्रम प्रसंगी प्रा.हर्षाली चौधरी, प्रा.हर्षदा शिंदे, प्रा.भाग्यश्री पाटील,प्रा.प्रगती पाटील तसेच श्री.संदीप बिऱ्हाडे, रेहान मुजावर यांची विशेष उपस्थिती होती.
उपप्राचार्य प्रा.डॉ.विजय तुंटे यांनी प्रस्तुत कार्यक्रमात बोलताना म्हटले की, “पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज आहे,आज आपण लावलेली झाडे उद्याच्या पिढीसाठी ऑक्सिजनचा स्त्रोत ठरतील.” प्रा.डॉ.अमित पाटील यांनी सुद्धा वृक्षारोपणाच्या उपयुक्ततेवर प्रकाश टाकला.
वनस्पतिशास्त्र विभागप्रमुख प्रा.जयेश साळवे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना सांगितले, “जागतिक वन दिन हा केवळ एक दिवस नाही, तर वर्षभर चालणाऱ्या उपक्रमांचा प्रारंभ आहे. विभागातर्फे नियमितपणे वृक्षसंवर्धन आणि पर्यावरण जागृती कार्यक्रम राबवले जातील.” असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमादरम्यान प्रामुख्याने औषधी वनस्पती, फळझाडे आणि सावली देणारी झाडे लावण्यात आली. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने या उपक्रमात सहभाग घेतला आणि पर्यावरण रक्षणाचा यावेळी संकल्प केला.
वृक्षारोपणानंतर विद्यार्थ्यांसाठी पर्यावरण जागृती कार्यशाळेचेही आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत वनस्पतींचे महत्त्व, जलसंवर्धन आणि प्लास्टिक प्रदूषण या विषयांवर चर्चा झाली.
प्रा.हर्षाली चौधरी यांनी आभार मानले. तर प्रा.हर्षदा शिंदे, प्रा.भाग्यश्री पाटील, आणि प्रा.प्रगती पाटील यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात महत्त्वपूर्ण योगदान दिले.