• Sun. Jun 15th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

आंबेडकरी कवयित्रींच्या नवकविता विषमतावादी व्यवस्थेला आव्हान देत आहेत- प्रा. भरत शिरसाठ*

Apr 30, 2025

Loading

*आंबेडकरी कवयित्रींच्या नवकविता विषमतावादी व्यवस्थेला आव्हान देत आहेत- प्रा. भरत शिरसाठ*

जळगांव प्रतिनिधी

1990 नंतर आंबेडकरी साहित्यामध्ये क्रांतिकारक बदल झालेले असून खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाच्या माध्यमातून समाजात उत्पन्न झालेली विषमता आणि नव्या संदर्भासह उफाडून आलेली जातीयता याविरुद्ध आंबेडकरी कवयित्रींच्या कवितांमध्ये न्यायासाठी एल्गार पाहायला मिळतो असे प्रतिपादन बौद्ध साहित्य परिषद महाराष्ट्राचे महासचिव प्रा भरत शिरसाठ यांनी ऐरोली येथील केंद्रीय शिक्षिका रूपाली शिंगे यांच्या ‘सूर्याची सावली” या पुस्तक प्रकाशन प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून बोलताना केले. प्रसिद्ध साहित्यिक तथा बौद्ध साहित्य प्रसार संस्था आणि बौद्ध साहित्य परिषदेचे केंद्रीय अध्यक्ष प्रा. शुक्राचार्य गायकवाड कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते आणि लोककवी प्रशांत मोरे यांच्या हस्ते सदर पुस्तकाचे प्रकाशन संपन्न झाले. अनित्य प्रकाशनाचे प्रकाशक भटू जगदेव, ओएनजीसी चे जनरल मॅनेजर माननीय जागेश कुमार सोमकुवर व संजीवनी पतसंस्थेचे अध्यक्ष आप्पासाहेब शिवशरण, माननीय राजेश कुमार शिंगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
रूपाली शिंगे यांच्या कविता नवकविता असून या मनाला रुंजी घालणाऱ्या आहेत. या कविता आक्रमक नसून प्रेमाची भाषा करतात. त्या बुद्धाशी आपलं नातं सांगतात. शिव -फुले -शाहू -आंबेडकर यांना अभिप्रेत असलेली समता, बंधुता आणि स्वातंत्र्य मांडतात. हळव्या आणि नाजूक भावनांचा वापर करून धम्माचा विचार पेरतात. 1956 च्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मदीक्षेच्या क्रांतीनंतर आंबेडकरी समाज तथागत गौतम बुद्धांच्या करुणा आणि मंगल मैत्रीच्या दिशेने वाटचाल करत असून या सद्धम्माच्या मार्गाने आपले जीवन जगत आहे. तथागत गौतम बुद्धांच्या विचाराप्रती असलेली निष्ठा कवयित्री रूपाली शिंगे यांच्या शब्दा- शब्दातून प्रतीत होते. कवयित्रीचा प्रेमातून जग जिंकण्यावर विश्वास असून हेच त्यांच्या कवितेचे विद्रोही वातावरणाच्या पार्श्वभूमीवर वेगळेपण आहे असे म्हणता येईल, असे भरत शिरसाठ यांनी आपल्या व्याख्यानात प्रकर्षाने नोंदविले.
सिने पार्श्वगायक लोककवी प्रशांत मोरे यांनी आपण आपल्या वाढदिवशी महागडे गीफ्ट न देता पुस्तक दयावे, चांगल्या पुस्तकाचे चांगले वाचक व्हावे, असे आवाहन केले. आपल्या सुरेल व दमदार आवाजात कवीता गाऊन त्यांनी उपस्थितांची, काव्यरसीकांची मने मंत्रमुग्ध करून संपुर्ण जेतवन विहारातील वातावरणच बदलुन आपल्या सुरेल दमदार आवाजाचा ठसा निर्माण केला.
महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक सामाजिक व सांस्कृतिक क्रांतीपासून प्रेरणा घेऊन बहुजन समाजातून नवीन लेखक कवी व साहित्यिक तयार होत असून आपल्या सकस लिखाणातून ते समाजासमोर आंबेडकरी मूल्य व संस्कार मोठ्या ताकदीने मांडत आहेत. कवयित्री रूपाली शिंगे या त्याचेच एक उत्तम उदाहरण आहेत, असे प्रसिद्ध साहित्यिक प्राध्यापक शुक्राचार्य गायकवाड यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धार्थ शिरसाळे यांनी तर आभार राजेंद्र बाबरे यांनी मानले. सदर कार्यक्रमाला रसिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. भारतीय बौद्ध महासभा व इतर सहयोगी संघटनांच्या वतीने सदर प्रकाशन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed