• Sun. Jun 15th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

संजय एम.देशमुख(निंबेकर) – एक परखड,रोखठोक व समाजसेवी पत्रकार !*

Apr 30, 2025

Loading

*संजय एम.देशमुख(निंबेकर) – एक परखड,रोखठोक व समाजसेवी पत्रकार !*

अखिल भारतीय स्तरावरील लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेचे संस्थापक-राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय संजय बाप्पू देशमुख म्हणजेच *संजय माणिकराव देशमुख ( निंबेकर )* यांचा आज वाढदिवस……३ मे १९६६ ही त्यांची जन्मतिथी आहे. आजच्या दिवशी निंबा या गावी एका सामान्य शेतकरी कुटुंबात संजय बाप्पू यांचा जन्म झाला. त्यांचे प्राथमिक तथा माध्यमिक शिक्षण अर्थातच निंबा या त्यांच्या मुळ गावीच झाले. बालपणापासूनच लिखाणाची आवड असल्याने संजय बाप्पू वर्तमानपत्रं वाटण्यापासून ते वर्तमान पत्रात लिहिण्यापर्यत अगदी लहानपणापासूनच तरबेज झाले होते. पुढे ओळीने सर्व अग्रगण्य वर्तमान पत्रात ते ग्रामीण पत्रकार म्हणून ओळखल्या जाऊ लागले. १९८५ साली त्यांनी निंबा येथून *”वृत्तसंजीवनी”* नावाचे साप्ताहिक सुरू केले होते.वऱ्हाडी लेखक स्व.बाजीराव पाटील यांचे हस्ते व त्यांचे मार्गदर्शक गुरू स्वामी जोमानंद यांचे प्रमुख उपस्थितीत त्याचे निंबा येथे प्रकाशन झाले होते.
राजकारण ते समाजकारण असा सर्व प्रवास त्यांनी आपल्या वयाच्या पंचविशीत करून टाकला होता. अगदी कोवळ्या वयात बंडखोरी करून त्यांनी गावात प्रस्थापित लोकांना आणि अनुचित प्रवृत्तींना राजकीय दृष्ट्या शह देण्याचे काम केले.तेव्हापासूनची त्यांची ती धारदार लेखणी आजतागायत चालू आहे.याच काळात त्यांना पद्मश्री,शिक्षणमहर्षी ,माजी राज्यपाल डॉ.डी.वाय पाटील हे वझेगावी परमहंस रामचंद्र महारांच्या दर्शनार्थ आले असता त्यांच्या कार्यक्रमाच्या सुत्रसंचलनाचा योग आला.हिच त्यांची त्यांच्यासोबतच्या परिचयाची सुरुवात होती. नंतर *”कंसांडी”* या आध्यात्मिक त्रैमासिकाचे प्रकाशन आणि महाराष्ट्रभर वितरण तथा आध्यात्मिक, सामाजिक उपक्रमातील मार्गदर्शनासाठी अनेकवेळा ते मुंबईत जाऊन डी.वाय.पाटील यांचे सहवासात त्या. काळात राहत होते. कसांडीचे ते संपादक होते.नंतर त्यांनी त्यांच्या डी.वाय.पाटील आणि रामराव आदिक एज्युकेशन सोसायटीत सेवेतच सहभागी होण्याचा विचार केला.त्यांच्या लेखणी,संघटन आणि जनसंपर्क,अधिकारी मैत्रीचे कौशल्य आणि सर्वोत्कृष्ट पत्रलेखनामुळेच आदरणीय डी. वाय.पाटील यांना ही व्यक्ती महत्वाची वाटली. मग पुढे ते निंबा हे आपले मुळ गाव सोडून मुंबईतील त्यांच्या वरळीतील कार्यालयात स्थानापन्न झाले.*आदरणीय डी वाय पाटील यांच्या सोबत व नंतर ते बरीच वर्षे त्यांचे स्विय सचिव म्हणून मंत्रालयीन कामकाज, पत्रव्यवहार व भेटीगाठींचे कामकाज बघत होते.* परंतु एका ठिकाणी रमतील ते संजय बाप्पू कसले ? सतत खटाटोप करत नवनवे प्रयोग करणे हा त्यांचा मुळ स्वभाव आहे. ते मुंबईतील नोकरी सोडून अकोल्यात परत आले. मुंबई असतानाच अनेक संत,विभूती, कलाकार, साहित्यिक,पत्रकारांच्या संपर्कात होते. *डी.वाय.पाटील स्वागताध्यक्ष असलेल्या ६५ व्या अ.भा.मराठी साहित्त्य संमेलनाच्या व्यवस्थापनाच्या जबाबदारीत त्यांचा प्रमुख सहभाग होता.*
मुंबईतील सेवाकाळात त्यांच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना मदती केल्या.*कविवर्य स्व.जगदिश खेबुडकर त्यांचे खास मित्र होते.* दर आठवड्यात ते भेटत होते.त्यांनाही त्यांनी नेहमी सहकार्य केले.त्याच प्रेमाची परिणती म्हणजे बाप्पूंच्या लग्नाचे मंगलाष्टक स्व.खेबूडकरांनी त्यावेळी तयार केले होते.
मुंबईतून परत आल्यावर त्यांनी स्वतःचा प्रिंटिंग प्रेसचा व्यवसाय सुरू केला. “वृत्तसंजीवनी” नियमित करण्यात तांत्रिक अडचणीत वेळ खर्च न करता नंतर *”विश्वप्रभात”* नावाचे साप्ताहिक वृत्तपत्र त्यांनी सुरू केले. अन् मग आपली पत्रकारीता पुन्हा सुरू केली.
आजवर ब-याच पत्रकार संघटनेमध्ये संजय बाप्पू यांनी काम केले.एका संघटनेचे ते अकोला जिल्हाध्यक्ष पण होते. पण त्यांच्या मना सारखे काम होतांना काही त्यांना दिसत नव्हते.म्हणून मग शेवटी त्यांनी *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ* या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेची स्थापना केली. करोना काळात २०२१ मध्ये त्यांनी या महासंघाची अकोला येथून स्थापना केली. गेल्या चार वर्षांत महासंघाची वाटचाल बघता ही गरूडझेप ठरली आहे. आजवर संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकार महासंघ विस्तारला आहे.जिल्हा,तालूका शाखा स्थापन झालेल्या आहेत. चार राज्यांत पत्रकार महासंघाचा प्रवेश झालेला असून तिथे पण काम सुरू झालेले आहे. यासोबतच इंडीयन लॕंग्वेजेस न्यूजपेपर्स असोसिएशन (ईलना) या नवी दिल्लीच्या राष्ट्रीय संघटनेचे सुध्दा ते राष्ट्रीय पदाधिकारी आहेत,अगोदर जनरल सेक्रेटरी राहिलेले आहेत. सहकार क्षेत्रातही ते २४ वर्षांपासून कार्यरत आहेत. शासनाचा सहकारनिष्ठ पुरस्कारप्राप्त मानवधर्म नागरी सहकारी पतसंस्थेत ते सचिव,उपाध्यक्ष व अध्यक्षपदानंतर सध्या संचालक आहेत. मागासवर्गीय स्त्री राखीव जागा असल्याने निरक्षर महिला सरपंचासोबत त्यांनी निंबा येथील उपसरपंच म्हणून ५ वर्ष ग्रामीण विकासाची जबाबदारी पार पाडली.अशाप्रकारे डी.वाय.पाटील संस्थेतून शैक्षणिक तथा पूर्वी,नंतर आणि वर्तमानात सामाजिक,राजकीय, पत्रकारिता व वैद्यकीय सेवा क्षेत्रात ते गेल्या ४० वर्षांपासून सातत्याने वाटचाल करीत आहेत.

संजय बाप्पू देशमुख हे सतत बारा घंटे चोवीस तास पत्रकार महासंघाच्या वाढीसाठी झटत असतात. त्यांना थकवा किंवा कंटाळा असा कधी आलेला मी बघितला नाही. आपण सोबत असताना ते इतर विषयांवर सहसा बोलत सुध्दा नाहीत. मुंबई, पुणे, परभणी, कोकण असे बरेच दौरे मी त्यांच्या सोबत करत असतो. पण पुर्ण प्रवासात ते कुठं प्रेक्षणीय स्थळ बघत नाहीत की कुठं निवांत बसून पार्टीत रमत नाहीत. त्यांच्या डोक्यात सतत पत्रकार महासंघ घोंगावत असतो. गाडी चालवतानांही फोन सुरू असतात.ते कायम पत्रकार महासंघाच्याच कोमात असतात. त्यामुळे त्यांना बाहेर दुसरं असं काही दिसतच नाही. इतका सतत ध्यास घेऊन ते पत्रकार महासंघाचं काम करीत आहेत.
संजय बाप्पू देशमुख यांचा स्वभाव सरळसोट अन् रोखठोक आहे. त्यांना भ्रष्टाचारी अनाचारी लोकांची भयंकर चीड आहे. पत्रकार महासंघात त्यांनी तत्वाधिष्ठीत पत्रकारांसोबत, समाजसेवी लोक तथा साहित्यिक, कलावंत लोकांना सुद्धा स्थान दिले आहे. वकील, डॉक्टर्स, प्राध्यापक लोक यांचा मार्गदर्शक म्हणून पत्रकार महासंघाच्या या जडणघडणीत समावेश केलेला आहे. समाजातील सर्व स्तरातील क्रीम या पत्रकार महासंघात आपल्याला बघायला मिळतात. मनमिळावू,हळवा व परखड स्वभाव असलेले संजय बाप्पू जातीने सर्व पदाधिकारी व सभासद यांची विचारपूस करतात. समाजातील कमजोर घटकांना मदत करतात. सामाजिक उपक्रम राबवतात. रक्तदान शिबीर,१० वर्षांपासून मोतीबिंदूंची मोफत शस्त्रक्रिया शिबिरे, गरजु विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप असे बरेच समाजसेवी कार्यक्रम ते वर्ष भर करत असतात.
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा दर महिन्याला मासिक मंथन मेळावा संपन्न होत असतो.गेल्या एप्रिल महिन्याचा सलग ४४ वा नियमित कार्यक्रम होता. मुंबतही दर महिन्याला असे कार्यक्रम व महाराष्ट्रभर ठीकठीकाणी आज लोकस्वातंत्र्यचे उपक्रम सुरू आहेत. त्यात विविध विषयांतील तज्ज्ञ मंडळी मार्गदर्शन करायला बोलावली जाते. समाजात नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार सुध्दा दिल्या जातात. आजवर कित्येक मान्यवर लोकांना पत्रकार महासंघाने सन्मानीत केले आहे. संजय बाप्पू देशमुख यांच्या सतत कार्यप्रवण वृत्तीमुळे हे सर्व शक्य झाले आहे. न थकता, न कंटाळता ते सर्व कामे वेळीच करतात, करून घेतात, म्हणून हे कार्य होत आहे. त्यांना सहकार्य करणारी पत्रकार महासंघाची मंडळी कार्यक्षम आहे, ती आणखी तत्पर होवो अन् लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा वेलू अधिक गगनभरारी घेवो अशी सदिच्छा व्यक्त करून आदरणीय संजय बाप्पू देशमुख यांना वाढदिवसाच्या निमित्ताने लक्ष लक्ष शुभेच्छा देतो व त्यांना दिर्घ तथा सुदृढ आयुष्य लाभावे अशा कामना व्यक्त करून इथं थांबतो. धन्यवाद.

– पुष्पराज गावंडे
युवा कादंबरीकार, स्तंभ लेखक
तथा राष्ट्रीय मार्गदर्शक पदाधिकारी लोकस्वातंत्र्य
पत्रकार महासंघ, अकोला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed