
डाॅ .बाबासाहेब तुमच्या अचाट कर्तृत्वाला परिसीमा नाही!!
भारत हा देश ज्ञानाची उत्तम खाण आहे. जगाला आपल्या विचाराने उन्नत करतील असे ज्ञान ह्याच भूमीत निर्माण झाले. भारतात अनेक विदेशी विचारवंत अध्ययनासाठी येत असत. विशाल ज्ञानाचे, भांडार म्हणून भारत ओळखला जायचा. चरक, सुश्रृत, जीवक हे येथील ज्ञानयात्री होते .
तत्वज्ञानापासून सर्वच प्रकारचे ज्ञान भारतात असल्याने येथील सिंधू संस्कृती प्रगत होती. अवकाश, भूगर्भ,सागरी, अध्यात्मिक या क्षेत्रात सुध्दा लोक प्रगतीपथावर होते. अशा भारतात वैचारिक मंथन सुरु झाले ते बुध्दाने केलेल्या क्रांतीने ते विचार मानवास चिंतन करायला लावतात. खरी प्रबोधनाला चालना तथागत बुद्धाने दिली. जगाला वैज्ञानिक विचाराची मांदियाळी बुद्धाने निर्माण केली. कोणतेही शस्त्र हाती न घेता मानवाला प्रगत होता येते हे प्रत्यक्ष ज्ञान बुद्धाने दिले. पाली भाषेत हे ज्ञान अनुयायांनी लिहून ठेवले. त्यात महापरीनिर्वाण शब्द आला. जगात हा शब्द 2 महापुरुषासाठी वापरला गेला तो म्हणजे तथागत बुध्दासाठी व डाॅ. बाबासाहेबांसाठी होय. 6 डिसेंबर 1956 ला बाबासाहेब आंबेडकर जग सोडून गेले. तो दिवस महापरीनिर्वाण दिवस होय. निर्वाण म्हणजे मुक्त होणे. महापरीनिर्वाण म्हणजे जे महापुरुष जगासाठी जगले,भौतिक सुख, माया, मोह, ममता त्यांना सत्कृत्य करण्यापासून रोखू शकली नाही अशा महापुरुषाचे निर्वाण महापरीनिर्वाण ठरते. जगात तथागत बुध्द जे ज्ञानाच्या शेवटच्या क्षितिजाला पोहचले होते.म्हणजेच प्रबुद्ध अवस्था प्राप्त केलेली होती. तर आधुनिक काळातील थोर विश्वतत्वज्ञ डाॅ. बाबासाहेब हे प्रबुद्ध मार्गातील दिपस्तंभ होते. ते बोधिसत्व होते. त्यामुळेच त्यांना पाली भाषेच्या शब्दात महापरिनिर्वाण शब्द देहावसान झाल्यावर वापरला गेला.
तथागताच्या ज्ञानाला जगात तोड नाही कारण ते तार्किक, शास्त्रीय, चिकित्सक, विवेकी, इहवादी आहे. सत्यावर आधारित आहे. त्यामुळे असत्याचे रोपटे त्यांच्यापुढे वाढू शकले नाही. डाॅ.बाबासाहेब ह्यांना धर्म स्विकारायचा नव्हता. त्यांनी तथागताची मध्यम प्रवाहित, परिवर्तनशील विचारधारा स्विकारली.
धर्म स्वतःला परिवर्तनशील मानत नाही. त्यात सनातन मूल्य नसते. मानवाला केंद्रीत केलेले नसते. देव हाच त्याचा मुख्यकेंदबिंदू असतो. चमत्कार हा त्यांचा पाया असतो. मानवमुक्तीचा विचार हा विश्वाला शाश्वत मूल्ये देऊ शकतो म्हणून तो विचार डाॅ.बाबासाहेबांनी स्विकारला.
आज आम्ही बाबासाहेब आंबेडकरांना वाचतो परंतु कृतीत आणत नाहीत. जेव्हा बाबासाहेब आंबेडकर समजतील तेव्हा समाजात वैचारिक बदल होऊन विवेकनिष्ठ वैज्ञानिक ,तार्किक ,सत्यशोधक समाज निर्माण होइल. आज बाबासाहेब आंबेडकर समजल्याचा भाव अंगात येतो. मात्र ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी व्यक्तिपूजा नाकारली आपण पूजा,अर्चा करुन महापुरुष बंदिस्त केले. कशाला हवाय भीम नोटेवर ज्याने आणली रिझर्व बँक भारत भुमीवर!बाबासाहेबांच्या संकल्पनेतून रिझर्व बँकेची स्थापना झाली.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर कुणापुढे पैशासाठी झुकले नाही.स्वत:चा मुलगा यशवंत वारला असतांना खिशात पाच पैसे नव्हते. रमाई साहेबांना पैशाचे विचारते. साहेब नि:शब्द होते. रमा साहेबांच्या खिशात दमडी नाही हे ओळखते. स्वतःचा पदर फाडते. मुलाला कफन बनविते. अरे भावानो !हा भीम तेव्हा सुध्दा लाचार झाला नाही. मनात आले असते की लोकांना पैसा मागायचा तर लाखो लोक पैसा घेऊन आले असते पण माझा भीम झुकला नाही.ना झुकली रमाई पैशासाठी! कुणापुढे!! असा भीमा ज्याच्या ज्ञानाला नव्हती परिसीमा असा विद्वान पुन्हा होणार नाही हे खर आहे. आम्हाला पद, पैसा, प्रतिष्ठा देऊन ठगविले जाते. विकलो जातो आम्ही इमान गहाण ठेऊन अन स्विकारतो आम्ही लाचारी !त्यामुळेच आम्ही ज्वलंत समस्या देशापुढे, उभ्या असतांना झोपेचे सोंग घेतो.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी चळवळ उभी केली पण ती चळवळ कुणापुढे झुकली नाही. बहुजनांच्या चळवळी बाबासाहेब आंबेडकरकरांचे नाव घेतात
पण एकत्र येत नाही. बेरोजगारी, खाजगीकरण, जातीय धुर्वीकरण, अत्याचार, लुट, बेबंदशाही यावर आमचा आवाजच मारला गेला . कित्येक शक्कले केली आम्ही तुझ्या नावाने संघटनांची ह्या देशात पण तुझे अस्तित्व त्यात मुळी दिसत नाही. दिलेत ह्क्क लढण्याचे आम्ही आमच्यात लढलो. तु दिलेला चालणारा बुध्द आम्ही विहारातच ठेवला. साजऱ्या होतात जयंत्या ,स्मृतीदिन,वर्षावासही पण त्यात तू नसतोस! डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी सारे जीवन वाहिले. आम्ही कधी ना उतराई झालो तुझ्या दिलेल्या अनमोल त्यागाला ! बा भीमा!नाही समजून घेतले तुला ! अखेरच्या श्वासा पर्यंत सुध्दा बा भीमा बुद्धाचा धम्म सोपा करुन देत राहिला. शरिराची तु परीक्षा घेत राहिला. किती साथ देतील शरिराचे अवयव भीमा चेतना असे पर्यंत काम करण्याची तुझी सवय शरीरही ओळखू शकले नाही. बा भीमा आम्ही तुझी जातीत वाटणी करुन घेतली. तु कुणबी पुत्र बुध्दाला गुरू केलेस, माळी जोतिबाला आदर्श मानले. कबीर विणकराला आपले मानले. रविदासाला पुस्तक समर्पित केले. आम्ही हा तुझा वैश्विक भाव समजु शकलो नाही. श्रेष्ठ, कनिष्ठचे बांध फोडू शकलो नाही.बा भीमा तु बुध्दाचा विचार दिला आम्ही विषमतेचा धर्म पकडून ठेवला.आधुनिक युगात वाढते बुवाबाजीचे थोतांड आम्ही थोपवू शकत नाही. अतार्किक उपाय शिक्षित करु लागला.प्रसार माध्यमे खोटयाला डोक्यावर घेऊ लागले. पैशा मिळत असेल तर निती ही विकू लागले. समाजाने विश्वास ठेवून संविधानानुसार जगावे त्याला संविधान उन्नत केल्या शिवाय राहणार नाही हा संविधान देतांना घटनाकारांनी आशावाद दिला. महापरिनिर्वाण दिनानिमित्त डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन!!
पत्रकार
एस. एच. भवरे