

सालदार आणि मालक
आपला कृषीप्रधान देश आणि त्यातील आपला खानदेश शेतीनिष्ठ, श्रमाला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारा असा आहे. त्यातच समाज जीवनात वेगवेगळे सण उत्सव व त्यानिमित्त मानवी जीवन जगण्याच्या त्याच्या कष्टाला, त्याच्या आर्थिक अडचणीला, त्याच्या श्रद्धेला , त्याच्या जगण्याला एक नवी उमेद देत असतात. त्यामुळेच खानदेशातील अक्षय तृतीया हा सण ज्याला आपल्या अहिराणी भाषेत “आखाजी “असं म्हणतो. या सणाचे महत्त्व नुसतं सासुरवाशीनही माहेरवाशीन म्हणून माहेरी येऊन तिच्या भावभावनांना आपल्या अहिराणी बोलीच्यागीताच्या माध्यमातून वाट करून देत असते एवढेच नाही . त्याच्याही पलीकडे खानदेशातच हा आखाजी चा सन हे नवीन वर्ष म्हणून साजरा केला जातो. आणि या दिवशी शेतकरी, जमीनदार नवीन सालदार ठरवत असतात.
आता काळाच्या ओघात हे सर्व बदलतं की काय ..?असं वाटायला लागलंय !त्यात आमची आखाजी खरोखरच बदलली का..? गेल्या 40-50 वर्षाच्या कालखंडात खूपच काही बदलले आहे .
पन्नास वर्षांपूर्वीचे खानदेशी ग्रामजीवन म्हणजे गावाला रस्ता नाही, पाणी नाही, वीज नाही, शेत रस्ता नाही ,रणरणते उन ,घामाच्या धारा, चारा टंचाई त्यामुळेच गुराढोरांना प्रतिवर्षी पहाड काठी पाठवणे. शेतमजूर बांधकाम खात्याच्या नाला बल्डिंग कामावर जाणार. सकाळी सकाळी टिकम- पावडी घेऊन आपल्या अर्धांगिनीला सोबत घेऊन दुपारपर्यंत एक ब्रास खोदकाम करून गावी परत येणार तेव्हाच त्याची चूल पेटणार ..!असेच होते .असे असले तरी त्यात आनंद, आपुलकी ,सुख- समाधान होते. असा तो कालखंड होता.
शेतकरी आत्महत्येचा असा काही प्रसंगच नव्हता.
आणि ज्या दिवशी आखाजी असायची त्याच दिवशी गावातील मोठे चार दोन शेतकरी चांगला सालदार शोधण्यासाठी प्रयत्न करायचे तसा सालदार सुद्धा चांगला शेतमालक शोधायचा.. गरज दोघांची असायची. गावात साल कोण फोडणार? आखाजीला साल कोण फोडणार घराघरात चर्चा होयी. वाढग्यात, वाड्यात , मळ्यात बैठका व्हायच्या. गावात तसे नावाजलेले चार दोन सालदार असायचे, विठोबा, गजानन मिस्त्री , नारायण भाऊ वगैरे
तसेच काही मोठे शेतकरी रामदास आप्पा ,ताराआप्पा, हवेली वाले असायचे .त्यात काही गडी वर्षानुवर्षे एकाच मालका कडे साल भरत असायचे. मालक त्यांना सोडत नसे ते मालकाला सोडत नसत. त्यांचे साल प्रति वर्षी दोन-चार हजाराने वाढवून दिले जायचे .तो सुद्धा आपल्या मालकाच्या विश्वासाला जीवाचे रान करून सार्थक करायचा. शेतमालक सुद्धा त्याच्या कुटुंबाची, त्याच्या आर्थिक अडचणीची, त्याच्यात धन धान्याची काळजी आपलाच कुटुंबाचा समजून करायचा. गडी माणूस सुद्धा पहाटे पाच ला उठून गोठ्यात हजर व्हायचा. सर्व काही अलिखित होते. पण विवेक बुद्धीला जागून केलेले असायचे .
आता मात्र आमचे खेडे बदलले. आता कधीतरी आखाजी साठी गावी जाणे होते .
गाव खूपच पुढे गेले आहे .काँक्रीटचे रस्ते आले ,वीज आली, नळ आले. खारी -मातीचे घर जाऊन ,शहराने सुद्धा लाजे शरमेणे मान खाली घालावे असे काँक्रीटचे बंगले आमच्या गावात आले.
- पण आता या गावात सालदार मिळत नाही. सालदार म्हणतो पूर्वीसारखे शेतमालक नाही. शेतमालक, बागायतदार म्हणतात पूर्वीसारखे सालदार नाही. दोघांच्या दोन तर्हा ..! मालक आणि सालदार यांच्या मधला तो संघर्ष आहे. काळाच्या ओघात गावकाठच्या नागिन नदीमध्ये दोघांची शेती निष्ठा वाहून गेल्यासारखे वाटते.
आता एवढेच सांगावसं वाटते कि,मी आखाजी ला शोधत असतो श्रमालाही लाजवेल अशी प्रतिष्ठा जपणारा सालदार..! आणि श्रमाचे मोल जपणारा शेतमालक ..! गोकुळ बागूल
21,टेलिफोन कॉलनी,
अमळनेर.
जि. जळगाव.
मो.9422276140