धुलीवंदन सामाजिक एकतेचे प्रतिक!!! होळी नतंर दुसऱ्या दिवशी येणारा सण म्हणजे धुलीवंदन होय. कृषी संस्कृतीत सामाजिक एकता प्रस्थापित करणारा सण होय. कृषी संस्कृतीत बारा बलुतेदार, अलुतेदार त्याच प्रमाणे सर्व लोक शेतीला पुरक साधने पुरवित. शेतकरी एकटा शेती करित नव्हता. अनेक कारागीर शेती ला मदत करणारे साहित्य बनवत. त्यामुळे शेतकऱ्याचे सारे मदतगार बाकी समाजातील लोक होते. त्यावेळी जातीपातीची दरी नव्हती त्यावेळचा हा अप्रतिम उत्सव होय. अग्नी पुजेला महत्व दिल्यानंतर साऱ्या लोकांनी आपले राग, द्वेष, रुसवे फुगवे, मत्सर, निंदा नालस्ती, लोभ, मद, मोह,अज्ञान, कुविचार होळीत जाळुन दुसऱ्या दिवशी होळीची धुल म्हणजेच धुळ अंगाला लावुन आपण कोणतेही हेवे दावे न ठेवता एकमेकांना अंगाला धुल लावण्याचा दिवस होय. त्या काळी गवर्या म्हणजे शेण्या, औषधी वनस्पतीच्या फांदया, झाडाचा कचरा, सुकलेले विविध वनस्पतीची लाकडे यांना जाळुन पुर्वी वेगवेगळया टोळया हा उत्सव एकत्रित साजरा करित असत. ती राख पवित्र मानीत व त्या राखेला एकमेकांना लावीत. त्यात माती मिसळली जात असे. सकाळी थंड राखेला वंदन केले जाई. हेच ते धुलीवंदन होय. प्रत्येक काळात त्या पध्दतीत थोडा फार बदल झाला. पुढे रंगाचा शोध लागल्यावर मातीचे रंग एकमेकांना लावण्याची प्रथा सुरू झाली. पर्यावरणाची हानी न करता हा सण रंग व पाणी एकमेकांवर आनंदाने फेकून साजरा होऊ लागला. अनेक अख्यायिका जोडल्या गेल्या. शेतकरी कामातून उसंत मिळणाऱ्या काळात सण साजरे करतांना दिसून येतात. दिवाळी ही कृषी संस्कृतीत शेतकरी राजा कामातून वेळ मिळत असे त्याकाळात म्हणून मोठा सण दिवाळी सण साजरा होऊ लागला. पुर्वी होळी हा सण थंडीच्या दिवसात यायचा..आता हिवाळा कमी टिकतो. त्याकाळी थंडीत होळीचा आनंद आपल्याकडील डिसेंबरच्या थंडीसारखा होता. सर्वच समाज हा सण गाव मिळुन साजरा होत असे. यात स्त्री पुरुष आनंदाने एकमेकांवर धुलीची बरसात करुन सण साजरा करित. जीवन हे रंगबेरंगी आहे. त्यात अनेक सुखदुःख येतात. तरी त्या दु:खाला दुर सारणारे सण आहेत. उत्तर प्रदेश पासून तर सर्व भारतात विविध नावाने हा सण साजरा होतो. शिमगा, फागुन, धुलीवंदन, रंगपंचमी असे नावे दिलेली आहेत. सर्व लोक आपुलकीच्या नात्याने एकत्र येण्याचा हा सुंदर सण आहे. काही राज्यात धुलीवंदन म्हणून अभ्यंगस्नान करण्याची प्रथा आहे. रंगा प्रमाणे विविध मते असलेले स्वभाव असले तरी ह्या दिवशी आनंदाच्या रंगात न्हाऊन निघण्याची छान परंपरा आहे. काही राज्यात दुधात भांग हा पदार्थ टाकून हा आनंद साजरा करतात. कालांतराने बदल होत काही भटके लोक मोहाच्या फुलाचा अर्क काढुन तो मदय म्हणून पिऊन आनंद घेतात. ह्या सणात काहीही बदल होवो परंतू त्यामागे सामाजिक, सांस्कृतिक एकता दिसून येते. खेडयात नात्याने वहिनी लागणाऱ्या व नात्याने दिर लागणाऱ्या लोक एकमेकांवर रंग उधळतात. बंजारा समाजात ही हा सण 4/5 दिवस साजरा होतो. बरेच लोक होळीला गावाकडे जाऊन हया सणाचा आनंद घेतात. आजच्या युगात रंगात रसायनाचा वापर होतो. त्यामुळे पर्यावरण पूरक होळी काही ठिकाणी साजरी होत नाही. आपल्या पूर्वजांनी सणाचा आनंद नैसर्गिक वस्तूपासून घेतला. आपण चेहऱ्याला रंगाच्या रूपात रसायने वापरुन आनंद साजरा करतात. आज जातीय द्वेषाचे, धर्मांधतेच्या रंगाने विचार माखले गेलेत. विषमतेचा रंग इतका वाढविला की प्रेमाचा, एकतेचा रंग आम्ही फिका करुन टाकला. गावागावात पक्षाची दालने उघडुन समतेचा रंग काळा केला. खरा सामाजिक एकतेचा आनंद घ्यावयासा वाटत असेल तर धुलीवंदन व रंगपंचमीचा सण आहे.
पत्रकार
एस. एच. भवरे
मराठी लाईव्ह न्युज विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य
