मोटरसायकल अपघाताने थांबले धाडसी भाग्यश्रीचे स्वप्न; वडिलांसाठी ‘भाग्य’ ठरलेल्या कष्टाळू कन्येच्या निधनाने दीपक पाटील यांच्या जीवनात अंधार
अमळनेर प्रतिनिधी– धाडसी व कष्टाळू कन्या भाग्यश्री दीपक पाटील या जानवे येथील तरुणीचा मोटरसायकल अपघातात दु:खद निधन झाल्याने तिच्या कुटुंबाला आणि संपूर्ण गावाला शोककळा पसरली आहे. भाग्यश्री नेहमीप्रमाणे १२ तारखेला रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास दूध वाहून नेण्यासाठी मोटरसायकलवर दुधाचे कॅन बांधून अमळनेरकडे जात असतांना मंगरूळ-लोंढवे परिसरात अज्ञात वाहनाने तिच्या मोटरसायकलला कट मारल्याने ती नियंत्रण हरवून रस्त्यावर पडली. या दुर्घटनेत तिच्या डोक्याला जोरदार मार लागल्यामुळे ती गंभीर जखमी झाली. तिला तात्काळ गावातील लोकांनी उचलून जवळच्या दवाखान्यात नेले, पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
भाग्यश्री ही वडील दीपक पाटील यांच्यासाठी केवळ मुलगी नव्हती, तर व्यवसायात हातभार लावणारी ‘भाग्यश्री’ होती. दुग्ध व्यवसायात तिने वडिलांना मोठा आधार दिला होता. इतरांच्या भीतीशी कधीही घाबरलेली नव्हती. दीड महिन्यांपूर्वीच वडिलांना देखील मोटरसायकल अपघात झाला होता आणि डॉक्टरांनी त्यांना मोटरसायकल चालवणे थांबवण्याचा सल्ला दिला होता.
भाग्यश्रीने नुकतेच जय योगेश्वर माध्यमिक विद्यालय, अमळनेर येथील बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली होती. ती पोलीस खात्यात नोकरी करण्याचे स्वप्न बाळगून होती. मात्र, काळाच्या या क्रूर विळख्यात स्वप्नपूर्तीपूर्वीच तिने आयुष्य सोडले.
या घटनेमुळे पाटील कुटुंबीयांसह संपूर्ण गावात शोककळा पसरलेली असून सर्वत्र तिच्या आठवणी आणि धाडसाची चर्चा होत आहे. गावातील अनेकांनी विनंती केली आहे की, वाहन चालवताना हेल्मेट वापरणे आवश्यक आहे, कारण अपघाताने एका संपूर्ण कुटुंबाच्या आयुष्यात अंधार पसरवला आहे.
अमळनेर पोलीस स्टेशनवर या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध मृत्यू कारणीभूत ठरल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला असून योग्य तपास सुरू आहे. कुटुंबीयांना या अपार दुःखातून सावरण्याची शक्ती देवो हीच प्रार्थना या वेदनादायक घटनेसमयी सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
.