पाळधी गावात सत्यशोधक पद्धतीने साखरपुडा संपन्न !….
लग्न सोहळा देखील सत्यशोधक पद्धतीने होणार : प्रा.अनिल बोरसे
खान्देश माळी महासंघ तर्फे होणारा “सामूहिक विवाह सोहळा ” सत्यशोधक पद्धतीने होणार : वसंत पाटील
धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील
धरणगांव – तालुक्यातील पाळधी गावात म्हणजेच महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री नामदार गुलाबरावजी पाटील यांच्या गावात धुळे येथील सत्यशोधक समाज संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा.अनिल बोरसे यांचे चिरंजीव पियुष व पाळधी येथील कांतीलाल महाजन यांची मुलगी तेजस्विनी यांचा राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले यांच्या सार्वजनिक सत्यधर्म पद्धतीने साक्षगंध म्हणजेच साखरपुडा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सत्यशोधक समाज संघ महाराष्ट्र राज्य सचिव डॉ.सुरेश झाल्टे, प्रा.भूषण पाटील तालुकाध्यक्ष आबा पगार, खान्देश माळी महासंघाचे मुरलीधर महाजन, संतोष इंगळे, वसंत पाटील, सत्यशोधक विधीकर्ते राजकिशोर तायडे, शिवदास महाजन तसेच सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. खंडेरायाची तळी भरून साक्षगंधाला सुरुवात करण्यात आली याप्रसंगी छत्रपती शिवराय, संत सावता माळी, सत्यशोधक महात्मा फुले, ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले, शाहूजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे या महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यानंतर सत्यशोधक समाजाची प्रार्थना झाली.
प्रा.अनिल बोरसे यांचं बोरसे कुळ आहे व कुलदैवत पेडकाई माता आहे. कांतीलाल महाजन यांचे कुळ भामरे आहे आणि भामरे यांची कुलस्वामिनी म्हाळसा माता आहे.अर्थात बोरसे आणि भामरे कुळाचा वैवाहिक संगम आहे. अर्थात विवाह एका जातीचा नसून दोन कुळाचा आहे आणि दोन कुळाचा संगम आहे असे प्रतिपादन सुरेश झाल्टे यांनी केले. पालकमंत्री नामदार गुलाबरावजी पाटील यांच्या गावात प्रथमच सत्यशोधक पद्धतीने साखरपुडा संपन्न झाला याचे सर्वत्र कौतुक होत आहे.याची प्रेरणा सत्यशोधक समाज संघाचे अध्यक्ष अरविंद खैरनार ( छत्रपती संभाजी नगर ), उपाध्यक्ष दत्ताजीराव जाधव ( सातारा ), सत्यशोधक समाज संघाचे जिल्हाध्यक्ष पी डी पाटील यांच्याकडून मिळाली. याप्रसंगी खान्देश माळी महासंघाचे पदाधिकारी मुरलीधर महाजन, संतोष इंगळे व वसंत पाटील यांनी आश्वासित केले की जळगाव येथे होणारा “सामुहीक विवाह सोहळा ” यावर्षी सत्यशोधक पद्धतीने विवाह लावणार असे प्रतिपादन वसंत पाटील यांनी केले.